सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (०३ ऑगस्ट) : हटवांजरी येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या समर्थनात आता स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने पाठिंबा दिला. शेतकऱ्यांला आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आज मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून मा. जिल्हाधिकारी यांना केली आहे.मौजा हिवरा येथील खरेदी केलेल्या शेतीची चुकीच्या पद्धतीने मोजणी सीट तयार केल्याचा मनस्ताप सहन न झाल्याने हटवांजरी येथील देवराव लक्ष्मण फरताडे या शेतकऱ्याची दुर्दैवी आत्महत्या घडली. फरताडे यांची चुकीच्या पद्धतीने मोजणी सीट तयार झाल्याने त्यांनी सुधारणेसाठी भूमिअभिलेख कार्यालयात वारंवार येरजाऱ्या घातल्या. मात्र, त्यांच्या मागणीला कुठलीही दखल भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळेच भूमिअभिलेखला वैतागून विषारी द्रव्य प्राशन करावे लागले. आत्महत्यापूर्वीच शेतकऱ्याने भूमिअभिलेखला तक्रार केली होती. तहसीलमध्ये सात दिवसाच्या आत पोट हिस्याची मोजणी सीट तयार नाही केल्यास कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर उपोषण मांडू असा इशारा ही दिला होता. त्यांच्या उपोषणात अडथळा निर्माण झाल्यामुळे आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या मारेगाव येथील कर्मचाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करून तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी आमची मागणी आहे.
अन्यथा स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने भूमिअभिलेख कार्यालयाच्या विरोधात मारेगाव शहराच्या हद्दीत तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या स्थितीला आपण सर्वस्वी जबाबदार असाल असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राजुभाऊ मांदाडे उपाध्यक्ष, सचिन पचारे जिल्हाप्रमुख यवतमाळ, विशाल किन्हेकार, सोमेश्वर गेडेकार, विजुभाऊ मेश्राम, अनिलभाऊ राऊत, विकास राऊत, राजुभाऊ खडसे, प्रवीण गमे, अतुल पचारे, तुकाराम वासाडे, गोपाळ खामनकर, इ. उपस्थित होते.