सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (११ जुलै) : झरी तालुक्यातील माथार्जून येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
काल दिनांक १० जुलै रोजी झरी तालुक्यात काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. माथार्जून लगत असलेल्या नाल्याला पूर आला ज्यात मोठ्या प्रमाणात पुराड वाहून आले, त्यामुळे पुलाचे पाणी अडल्याने पुराचे वाहणारे पाणी सरसकट पुला लगत असलेल्या जनाबाई रामदास कोटेवार यांच्या शेतात शिरले. यावेळी शेताला तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळाले. ज्यात पिकांचे नुकसान झाल्याचे जनाबाई यांनी सांगितले.
तसेच येथील सदाशिव गुलाब पेंदोर यांचे शेत माथार्जून येथून २-३ किमी अंतरावर असून यांच्याही शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र आहे. यांना पाण्याचा चांगलाच फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून शिबला ते झरी रोड चे बांधकाम संथ गतीने सुरु असलेल्याने येथील पुला लगत असलेल्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. शेताची पाहणी करून संबंधित विभागाने यात झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.