सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे
वणी, (ता.१७) : मागील ७ वर्षांपासून मोदींच्या भाजप सरकारचे काळात देशभरात सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून देशातील मुख्य धारेतील शेतकरी व कामगार सातत्याने आंदोलनरत आहे. ह्यांना दिलासा देण्याऐवजी ह्यांना गुलामगिरी च्या खाईत ढकलण्याचे कायदे ह्या मोदी सरकारकडून केल्या जात असून जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून देशातील जनतेकडे असलेनसले ही काढून घेतल्या जात आहे, या करिताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रचंड नारेबाजी करीत निदर्शने आंदोलन दिनांक १७ जून रोजी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी केले.
मागील ७ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मागण्या त्वरित पूर्ण करीत तीन काळे कृषी कायदे रद्द करावीत, अन्न धान्य, डाळी, तेल व ईतर खाद्य पदार्थांची झालेली भाववाढ कमी करावी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही त्यावर प्रचंड कर लावून पेट्रोल, डिझेल व गॅस च्या किमती ची भाववाढ केल्याने आधीच लॉकडाऊन मध्ये भरडला गेलेल्या जनतेला पुन्हा आगीत ओतण्याचे कार्य केंद्र सरकार कडून केल्या जात आहे, याकरिता ताबडतोब पेट्रोल, डिझेल वर लावलेले कर रद्द करून किमती सामान्य कराव्या, निराधार,बांधकाम कामगार, घरकामगार, टपरीवाले, छोटे धंदेवाईक यांना जाहीर केलेली आर्थिक मदत ताबडतोब द्यावी, शेतकऱ्याचे थकीत कर्ज माफ करून नव्याने कर्ज पुरवठा करावा, रासायनिक खतांच्या साठा, बोगस खते व भाववाढ यांवर नियंत्रण आणून मुबलक योग्य खत पुरवठा करावा, कोरोना काळात युद्धस्तरावर फार मोठी सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करून १८ हजार ₹ मासिक करावे आदी मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करीत त्या प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना देण्यात आले.
या आंदोलनात शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, ऍड दिलीप परचाके, मनोज काळे, खुशालराव सोयाम, किसनराव मोहूरले, नंदकुमार बोबडे, सुधाकर सोनटक्के, संजय कोडापे, शिवशंकर बांदूरकर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.