मांडवी शिवारात पुन्हा वाघाचा थरार, दोघांवर हल्ला, बैलाने ठोकली 'धूम'

                      (संग्रहीत फोटो) 


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (ता.३१) : झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे आज वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा बालंबाल वाचला.

याबाबत सविस्तर माहिती नुसार सुधाकर रामभाऊ मेश्राम वय (३५),रामकृष्ण कानू टेकाम (२२) दोघे ही राहणार बेलमपल्ली हे दोघे शेतात कडब्याचे गंजी मारून बैलाला पाणी पाजायला जुनोनी शिवारातील चाटवण नाल्यावर गेले, असता दोन्ही बैले वाघाच्या वासाने धूम ठोकून पळून गेली. वाघाने बैलांकडले लक्ष या दोघांवर केंद्रित करून सदर वाघाने अचानक दोघांवर हल्ला चढविला, यामध्ये वाघाने सुधाकर याची मान तोंडाने पकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वाघाने सुधाकरच्या मांड्या,पाय, पाेटर्या,हाता पायाला पकडून ठेवल्याने सुधाकर गंभीर जखमी झाला. रामकृष्ण याने वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि वाघ त्याच्या मागे लागल्याने रामकृष्ण हा झाडावर चढला मात्र, वाघाने रामकृष्ण ला झाडावर चढू न देता त्याच्या पायाला पकडले व त्याला खाली आेढु लागला. त्यामुळे त्याची पायाची बोटे पूर्णपणे कुरतडले गेले, झाडाला पकडूनही वाघाच्या ताकती समोर रामकृष्ण ची ताकद कमी पडली आणि तो झाडावरून खाली पडला. जोराजोराने आवाज केल्याने जवळपास बैलगाडी घेऊन पाणी पाजणारे सहा ते सात शेतकरी मदतीला धावून आले, शेतकरी आरडाओरड केल्याने वाघ तेथून निघून गेला. मात्र तोपर्यंत सुधाकर ची अवस्था आणखी गंभीर झाली. रामकृष्ण ला पायाला मार लागला मात्र तो यामध्ये बालंबाल वाचला.  'दैव तारी त्याला कोण मारी' असा प्रत्यय त्या दोघांनाही आला. वेळ आली मात्र, काळ आला नव्हता त्यामुळे सुदैवाने दोघांचे प्राण वाचले. शिवारातच काम करत असलेला राजू मेश्राम आणि सुनील मेश्राम या दोघांनी त्या दोघांना बैलगाडीत बसवून मांडवीगावा पर्यंत आणले, वनविभागाला सुचित केले, वनविभागाची गाडी येऊन त्या दोघांना प्रथम पांढरकवडा येथे घेऊन गेले मात्र, पांढरकवडा येथून त्यांना जखम गंभीर असल्याने सरकारी रुग्णालय यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा वाघांनी दोघांवर हल्ला केला होता ते मांडवी येथीलच होते मांडवी परिसरात पाच वाघाचे वास्तव्य असून सुमारे एक ते दीड वर्षापासून पाच वाघ परिसरातील नागरिकांना दिसून येतात सद्यस्थितीत मशागतीची कामे सुरू असून शेतकरी शेतात वखरणी चे कामे करीत आहे.