सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वणी मार्गावरील गौराळा खदान परिसरात उभ्या असलेल्या टिप्परमुळे भीषण अपघात होऊन एका शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुक्टा येथील शेतकरी नारायण पंढरी पोईनकर (अंदाजे वय 34) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते दिवसभर शेतीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीची वणी मारेगाव हायवे रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला जोरदार धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतकाच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.
दरम्यान, या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, संबंधित टिप्पर कोणतीही सूचक चिन्हे किंवा लाईट न लावता रस्त्यावर उभा ठेवण्यात आल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मारेगाव पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर जड वाहने विनाकारण उभी राहत असल्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत आहे. अपघाताची शक्यता वाढत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.