सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : आधीच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पावसाचे संकट घोंगावत आहे. नुकतेच स्थिरावलेले हवामान पुन्हा ढगाळ बनल्याने आणि पावसाचे संकेत दिसू लागल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. शेतात उरलेसुरले पीक आता वाऱ्यावर असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यासाठी दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी येलो अलर्ट तर 29 ऑक्टोबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर येथील मौसम विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मौसम खात्याने जारी केलेल्या ऑरेंज अलर्टनुसार, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वीज कडकडाटासह मेघगर्जनाही अपेक्षित आहे.
दरम्यान, आधी झालेल्या अतिवृष्टीची शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. आणि आता पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. “सरकारने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीचे धोरण जाहीर करावे,” अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.