सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी व इतर कर्मचारी गट ग्रामपंचायत (डोलडोंगरगांव) हे योग्यरित्या कामे करीत नसल्यामुळे चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी व इतरही मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगीराज बल्की यांनी सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले. येत्या १५ दिवसात सर्व प्रश्न सोडणार असल्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर योगीराज बल्की यांनी आपले उपोषण २४ तासात मागे घेतले आहे.
दरम्यान माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व आश्वासन देण्यात आल्यानंतर सरपंच संघटनेचे मारेगाव ता. अध्यक्ष तथा भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट व मारेगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी व्हनखंडे साहेब यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले आहे. काल सकाळी नऊ वाजता लाखापूर स्थित हनुमान मंदिर परिसरातील रस्त्यावर त्यांनी उपोषण केले होते.
मागील दोन वर्षांपासून दुर्लक्षित लाखापूर तसेच डोलडोंगरगांव व पारधी बेडा मधील प्रश्नावरून गुरुदेव भजन मंडळाचे अध्यक्ष योगीराज पुंडलिक बल्की यांनी सरपंच ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात आक्रमक झालेले दिसले. मारेगाव पंचायत समिती, तहसील कार्यालय यांना वारंवार निवेदन सादर करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत डोलडोंगरगांव पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात उपोषण सुरु केलं होतं.
दोन वर्षात यांना नियोजन करता आले नाही. लाखापूर च्या इतिहासात आतापर्यंत कधी उपोषण, मोर्चा आंदोलन करण्याची गरज पडली नाही, मात्र मुजोर पदाधिकारी ग्रामपंचायत मध्ये बसल्याने आम्हाला उपोषण करावे लागलं असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना केला.
गावातील समस्या,प्रश्न पंधरा दिवसांत सोडवणार असं लेखी आश्वासन दिल्यावर तूर्तास त्यावर मी कुठल्याही बाबत बोलणार नाही. मात्र,जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी परत उपोषणास बसणार असा इशाराही उपोषणकर्ते योगीराज बल्की यांनी दिला. विशेष उल्लेखनीय की, वनोजा देवी ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रशांत भंडारी व सदस्य सुधाकर धांडे यांनी या उपोषणास काल उपस्थित राहून पाठिंबा दिला होता.
आज शनिवारी निंबू पाणी पाजून उपोषण मागे घेतेवेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, भाजपा ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, शिवसेनेचे प्रवीण बल्की, ग्रामपंचायत सदस्य आकाश भोसले, माजी सरपंच यासह गावातील पुरुष महिला व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.