रोजगार हमीची थकीत रक्कम तत्काळ अदा करा- सरपंच संघटनेची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीरी मंजुर करण्यात आल्या असुन या योजनेअंतर्गत विहीरीचे बांधकाम सुरु आहे.मात्र, अजुनही अनेक विहीरीचे देयके अदा करण्यात आलेली नाही.त्यामुळे शेतकरी, तथा शेतमजुर अडचणीत सापडले आहेत.

सन 2023-24या आर्थीक वर्षा मध्ये शासनाच्या वतीने 404 विहीरीला मंजुरात देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कायम स्वरुपी सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी व त्याच्या उत्पन्नात भर पडवा म्हणुन शासनाने ही योजना सुरु केली आहे. या हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात विहीरीचे बांधकाम पुर्ण झाले असुन अनेक विहीरी बांधकाम पुर्ण होण्याच्या मार्गांवर आहे. परंतु अजुनीही लाभार्थ्याना लाभाची रक्कम वितरण करण्यात आली नाही.त्यामुळे शेतकरी, शेतमजुर अडचणीत सापडला असुन विहिरीच्या बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

थकीत असलेली ही रक्कम तत्काळ अदा करावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका शाखा मारेगावचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे यांना देण्यात आले आहे. उपसरपंच सुरेश लांडे, खैरगाव सरपंच रामचंद्र जवादे, कोथुर्ला सरपंच श्रीकांत गौरकार,वनोजा उपसरपंच प्रशांत भंडारी,बोरी सरपंच प्रवीण नान्हे, मारोती तुराणकर, पहापळ सरपंच राहुल आत्राम, टाकळी उपसरपंच दिलीप आत्राम, महिला अध्यक्ष मालाताई गौरकार, पिसगांव सरपंच मंदाताई मेश्राम,पाथरी सरपंच गोवर्धन तोडासे, पाथरी उपसरपंच शशिकांत तावाडे, यांचे सह इतर सरपंच उपसरपंच सदस्य यांची उपस्थिती होती.