अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्या - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : खरीप (जुलै 2023) मध्ये तालुक्यात अतीवृष्टी होऊन अनेक शेतक-यांच्या जमीनी उभ्या पिकासह खरवडून गेल्या होत्या, त्यावेळी अनेक अधिकरी पदाधिकरी यांनी प्रत्यक्ष मोका पाहणी करुन सरकार आपल्या पाठीशी असल्याचे अभिवचन दिले होते. परंतू या आश्वासनांचा विद्यमान सरकारला पूरता विसर पडला असून, या खरवडून गेलेल्या जमिनीच्या मशागतीकरीता प्रचंड खर्च येणार असून अद्याप शासनाकडून एक रुपयासुध्दा नुकसानग्रस्ताना मिळाला नसल्याने, त्या झालेल्या अवकाळी नुकसानीची आर्थिक मदत, खरवडून गेलेल्या जमिनीच्या दुरुस्तीकरिता भरीव मदत व खरीप हंगाम 2023 पिक विम्याची रक्कम शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना अदा करावी अशी आग्रही मागणी वणी तालुका राष्ट्रवादी शाखेच्या वतीने करण्यात निवेदनातून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली. 

तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपा सह रब्बी हंगामातील पिकांची प्रचंड नासाडी मोठ्या प्रमाणात झाल्याने आपण कुटुंब प्रमुख आहात म्हणून वरील नमूद विषयी त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच शेतकऱ्यांनी उतरविलेल्या पिक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम वणी तालुक्यातील मोजक्या शेतकऱ्यांनाच दिवाळीपूर्वी मिळाली व अनेकांना अद्यापही मिळालेली नाही तसेच काही लोकांना केवळ 10 ते 90 रुपये त्यांचे खात्यावर जमा करुन विमाकंपनी शेतकऱ्याची चेष्ठा करीत आहे, हे योग्य नाही. असे मत जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांनी आमच्या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले.

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावे व शेतकऱ्यांच्या कापसाला 12 ते 15 हजार रुपये व सोयाबीन ला 7 ते 8 हजार रुपये भाव देण्यात यावा अशी एकमुखी मागणी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे (शरद पवार समर्थक) यांच्या नेतृत्वात वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते आबीदभाई, जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे, ता. का. अध्यक्ष खुशाल बासमवार, ओबीसी सेल चे गुणवंत टोंगे यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती.