भारत विरुद्ध पाकिस्तान थरार पुन्हा रंगणार...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

काल दिंनाक 2 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या, परंतु पाकिस्तानची फलंदाजी सुरू होऊ शकली नाही, सुमारे दोन तास प्रतीक्षा केल्यानंतरही परिस्थिती योग्य नसताना सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशावेळी दोन्ही संघाना 1-1 गुण देण्यात आला आहे. 
मात्र, भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार शक्यता आहे. कारण भारताविरुद्धचा सामना रद्द होऊनही पाकिस्तानचा संघ सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. पाक टीमने पहिल्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय मिळवला होता. टीम इंडियालाही सुपर-4 मध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे, कारण ब्लू टीमचा पुढचा सामना 4 सप्टेंबरला नेपाळसोबत आहे. जर भारताने नेपाळचा पराभव केला तर 10 तारखेला सुपर - 4 मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येतील. मात्र अशा परिस्थितीत भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. 

परंतु कालच्या सामन्यात इशान किशन आणि हार्दिक पांड्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली. टीम इंडियासाठी हार्दिकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 87 धावांची खेळी खेळली. इशानने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 82 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही.