रस्ता अपघात: अश्रू नयनांनी दिला चौघांना अखेरचा निरोप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात मारेगाव शहरातील एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी एकाच वेळी चौघांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मारेगाव शहरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले.

रफिक आणि युसूफ दोघेही सख्खे भाऊ होते आणि ते वेगवेगळ्या व्यवसायात होते. दोन्ही कुटुंबात एकता होती. नियतीने पत्नीसह दोन्ही भावांवर कहर केला. शुक्रवारी चंद्रपूरहून परतत असताना त्यांच्या बेलोरा गाडीला चिंचाळा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चारही जणांचा मृत्यू झाला. चौघांच्या मृत्यूची बातमी मारेगावात पसरताच शोककळा पसरली. शनिवारी एकाच वेळी चौघांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी तालुक्यातील नातेवाईकांसह  मित्र परिवार, हजारो जनसमुदाय त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झाले होते.
राजुरा हे एका कौटुंबिक कार्यक्रमाला गेले होते:
रफिक भाई यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय होता. तर युसूफ भाई यांचा मुख्य व्यवसाय कोल्ड ड्रिंक एजन्सी व शेती होता. रफिक भाई यांचा मुलगा जावेद मुंबईत इंजिनिअर आहे. आणि मुलगी मुस्कान चंद्रपुरात एमबीए करत आहे. युसूफ भाई यांची मुलगी सानिया NEET ची तयारी करत आहे आणि दुसरी मुलगी तंनवूर बी फॉर्म करत आहे. कुटुंबातील चार प्रमुख कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी गुरुवारी राजुरा येथे गेले होते. परतीच्या प्रवासात युसूफभाईंनी बल्लारपूरमध्ये काही काळ घालवला, युसूफभाईंच्या कुटुंबाची गाडी पडोली मार्गावरून जात असताना चिंचाळा गावाजवळ दुभाजकावर आदळली. ज्यात चौघांनाही आपला जीव गमवावा लागला.