सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा विपरित परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, बोरवेलचे मीटर, काम्पुटरमध्ये बिघाड येत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्यातील नागरिक वेळेवर वीज बिलाचा भरणा करतात. बिल भरण्यास उशीर झाल्यास कंपनीचे वायरमन लगेचच वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देतात. मग, वीज गायब झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तोंडे का लपवतात, त्यांचे फोन का बंद किंबहुना फोन रिसिव्ह केले जात नसतात. असा सवाल रहिवाशी करत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून भर उन्हाळ्यात अनियमित वीजपुरवठाचा त्रास दिवस रात्रपाळीत शहरासह ग्रामीण रहिवाशी सहन करत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहर व ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येवर अनेकवेळा विविध गावातून निवेदने देण्यात आली, मोर्चे, उपोषण, आंदोलने करून देखील महावितरणाचा भोंगळ कारभार अद्यापही सुधारलेला नाही.