लाठी येथील शेतकऱ्याने आत्महत्येचा दिलेल्या ईशाऱ्याची वेकोली (WCL) प्रशासनाने घेतली दखल, शेतातील नाले बुजावण्याचे कामाला सुरुवात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील लाठी येथील शेतकरी प्रभाकर खारकर यांचे उकणी खंड 1 मधील गट क्र 569/2 हे मागील पावसाळ्यात वेकोलीच्या डम्पिंग मुळे संपूर्ण पाण्याने शेत भरल्यामुळे शेतात मोठ-मोठे नाले पडले होते. सदर नाले बुजवण्यासाठी (जमिनीची लेव्हल करून देण्यासाठी) मागील 8 महिन्यापासून ते सतत पाठपुरावा निवेदनाच्या माध्यमातून असो की, चर्चेच्या माध्यमातून GM ऑफिस व सबएरिया ऑफिस कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. मात्र, त्यांना केवळ आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीही मिळत नव्हते.


उकणी सबएरिया यांच्या ऑफिस ला सलग 8 महिन्यापासून हा शेतकरी निवेदन भेटी घेत असताना सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा आश्वासनाच्या पलीकडे काहीही मिळाले नाही. अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्याने या जगाचा निरोप घ्यायचा असे ठरवले, तसे रीतसर शेतकऱ्याने वेकोली प्रशासनातील उपक्षेत्रीय प्रबंधक उकणी व क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नार्थ यांच्या कार्यालयात दि.21 मे रोजी आपण जाऊन आत्महत्या करणार असा ईशारा दिला होता. शेतकऱ्याने टोकाची भूमिका, आत्महत्येचा ईशारा देताच, वेकोली प्रशासनाने वेळीच दखल घेऊन 19 मे रोजी संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील नाले बुजावण्याच्या कामाला सुरुवात केली.

अवघ्या काही दिवसात शेतीचा हंगाम येवून ठेपला होता. मात्र, पोटाची खडगी भरण्यासाठी शेतात पडलेल्या नाल्यामुळे शेतीही वाहता येत नव्हती. त्यामुळे मी स्वतः मागील 8 महिन्यापासून खूप त्रस्त होतो. वारंवार निवेदन तथा मौखिक सांगून सुद्धा वेकोली लक्ष देत नव्हते, त्यामुळे माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता म्हणून मी या जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना लेखी पत्राद्वारे कळविले. मात्र, वेकोली प्रशासनाने वेळीच माझ्या निवेदनाची दखल घेऊन शेतातील मोठंमोठे पडलेले नाले एका दिवसात बुजवून दिले मी समाधानी आहे. मात्र, असा अन्याय कोणावरही होऊ नये असे मत शेतकऱ्याने "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना व्यक्त करित वेकोली प्रशासनाचे आभार मानले.