कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : "गुरुदेव हमारा प्यारा हैं जीवन का उजियारा" आज दि.14 ऑक्टोबर. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पिसगाव येथे ग्रामउन्नतीच्या तळमळीतून "ग्रामगिता" लिहिणारे, आपल्या रचनामधून सेवा, भक्ती आणि राष्ट्रकार्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या राष्ट्रसंतांना शेकडो गुरुदेव प्रेमिकडून आदरांजली वाहण्यात आली.
तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि किर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
पावन पर्वावर आज गावोगावी खेडपाडी त्यांना जेष्ठ बाल पुरुष महिला तसेच गुरुदेव प्रेमीकडून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहण्यात येत असताना पिसगाव येथे गुरुदेव प्रेमिनी आदरपूर्वक त्यांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहली. दरवर्षी प्रमाणे यावेळी राष्ट्रसंतांच्या भजनाचा कार्यक्रमाने व महाप्रसादाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे गुरुदेव उपासक श्री मारोती गौरकार (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मारेगाव) यांनी सर्व गुरुदेव प्रेमिना राष्ट्रसंताचे भजनाच्या माध्यमातून प्रभोधन विचार मांडले. गुरुदेव भजन सेवा मंडळ व जगन्नाथ बाबा भजन सेवा मंडळ आयोजित महोत्सवाला मारोती गौरकार, सुरेश झाडे,विठ्ठल टोंगे, हनुमान जुमनाके,सुखराज दूधकोहळे,विठ्ठल रस्से, दुमदेव बेलेकर,वासुदेव चिकटे, सौ माया रस्से,रमेश झाडे,दिगंबर रस्से,सौ माया गेडाम,सौ कुंता वसाके,सौ प्रेमीला उलमाले,सौ गोखरे ताई, यांच्या उपस्थितीत या पुण्यतिथी महोत्सवात असंख्य गावकरी व परिसरातील गुरुदेव प्रेमिंची लाक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली.