कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
या आंदोलनात प्रामुख्याने सर्व सामान्यांच्या मागण्या लावून धरण्यात आल्या, वाढत्या महागाईने व सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरिबांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने काही ठोस निर्णय घ्यावे व सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील मूलभूत गरजेकडे लक्ष देऊन त्यांना आपले जीवन सुरळीत जगण्याचे मार्ग मोकडे करावे या करिता वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांचे मार्गदर्शनाखाली तर, श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात व वंचितचे जेष्ठ नेते मिलिंद पाटील, निरज वाघमारे, लक्ष्मण पाटील, मंगल तेलंग, शिवदास कांबळे, सौ. धम्मावतीताई वासनिक, पुष्पाताई सिरसाट, करुणा मुन, सरला चचाणे, किशोर मुन, अर्चना नगराळे यांचे उपस्थितीत विविध मागण्यांना घेऊन आज दि.11 ऑक्टोबर रोज मंगळवारला जनआक्रोश महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
यात वयोवृद्ध, विधवा माता बघिणी व दिव्यांगाना मिळणारे तुटपुंजे 1 हजार निराधार मासिक वेतन वाढवून 5 हजार रुपये करण्यात यावे, निराधार लाभार्थ्यांचे वय मर्यादा 65 वर्ष असून ती 60 वर्ष करण्यात यावी, निराधार पात्रतेसाठी 21 हजार रुपये असलेली वार्षिक उत्पनाची अट 75 हजार रुपये करण्यात यावी, 5 एकर खालील सर्व शेतकऱ्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा, दिव्यांग व्यक्तींसाठी निराधार योजनेकरिता 1 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा करण्यात यावी, सर्व दिव्यांग नागरिकांना 2 लाख रुपया पर्यंतचे व्यावसायिक कर्ज 80 टक्के अनुदानावर विनाअट देण्यात यावे, निराधारांच्या मासिक वेतन नियमित देण्यात यावे, सर्व बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींना कायम स्वरूपी रोजगार मिळेपर्यंत 15 हजार रुपये मासिक भत्ता देण्यात यावा, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, पुरपिडित शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, यावर्षी अतिवृष्टी झाल्याने सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ देण्यात यावा, जीवनावश्यक वस्तूवरील लावलेला जि.एस.टी. कर रद्द करावा व वाढती महागाई कमी करावी, सर्व निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या याकरिता इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बंद करून बॅलेट पेपरवर पार पाडाव्यात, शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व शेती साहित्यावरील जीएसटी कर तात्काळ रद्द करावा, अशा विविध मागण्या घेवून आज मंगळवारी जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
यात तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी,शेतमजूर, वयोवृद्ध निराधार, दिव्यांग, व विधावा माता बघिणी व बेरोजगार युवक युवतीं शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.