सह्याद्री चौफेर | न्यूज
यवतमाळ : वणी तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा पडला आहे. लगतच्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी वर्धा नदीला आलेल्या पुराचे पाणी या गावांमध्ये घुसले आहे. सर्व नागरिक सुरक्षित असून प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. झोला व कोणा गावचे सुमारे एक हजार नागरिकांना वणी आयटीआय येथे त्यांचे पशुधनासह स्थलांतरित करण्यात आले आहे.
सध्या परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे. गरज पडल्यास आवश्यक ती सर्व व्यवस्था करून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाहीं , असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे. जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन च्या 3 टिम तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल ची नागपूर इथून एक टीम येथे कार्यरत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक छोट्या बोटीने कोना गावातील एका सिकलसेल रुग्णाला वणी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील उकणी, जुनाड, शिवणी (ज), सेलू (खु), भूस्की, कवडशी, रांगणा, चिंचाली, सांवगी (नवीन), झोला, कोना गावांना पुराचा वेढा पडला आहे.
जिल्हाधिकारी यांनी रांगण येथून ड्रोन कॅमेरा द्वारे 11 गावातील पूर परिस्थिती पाहणी केली तसेच वणी आय.टी.आय.येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेल्या नागरिकांची देखील चर्चा केली. जीवित हानी वाचवण्याला प्राथमिकता देण्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले. शेती नुकसानीची भरपाई शासनाकडून लवकरच देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
पुरातलेल्या प्रत्येक गावासाठी एक एक तलाठी मंडळ अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असून पुराच्या वेड्यात अडकलेल्या नागरिकांसाठी तसेच स्थलांतरित नागरिकांसाठी जेवण व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना यंत्रणेला दिले आहेत. यावेळी त्यांनी सेलू येथील सरपंच यांच्याशी मोबाईल द्वारे चर्चा करून गावातील नागरिकांच्या सुरक्षा बाबत विचारणा केली. काय आवश्यकता आहे का, घरात पाणी शिरले का याबाबत विचारणा केली.
पुरामुळे बंद झालेल्या वणी वरोरा रस्त्याची जिल्हाधिकारी यांनी यावेळी पाहणी केली. याप्रसंगी आमदार संजीव बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार निखिल धुरजड व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.