भालेवाडी येथील नागरिकांना पाणी टंचाईची ऐन रखरखत्या उन्हात झळ


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल पेसा गावातील नागरिक मूलभूत गरज असलेल्या पाण्यापासून गेल्या चार दिवसांपासून वंचित आहे. कर्मचाऱ्यांच्या बेताल पणाने नागरिकांना पाणी टंचाईची ऐन रखरखत्या उन्हात झळ सोसावी लागत असल्याचे आरोप होत आहे. परिणामी ग्रामस्थ थेट पंचायत समितीच्या दरबारातच ठिय्या आंदोलन करण्याचा तयारीत आहे.

भालेवाडी येथील जलकुंभातून येथील नागरिकांना पाणी पुरवठा करीत तृष्णा भागवित असल्याचा नित्यक्रम आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून पाणी पुरवठाच कायम बंद आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास येथील नागरिक वारंवार विचारणा केली असता टोलवाटोलवी उत्तर देत घुमजाव करीत असल्याचा येथील नागरिकांनी आरोप केला आहे. विशेष म्हणजे गावपातळीवर सामाजिक, धार्मिक अथवा कौटुंबिक कार्यक्रम असला की ग्रामपंचायत चपराशी व रोजंदार हमखास वेळकाढू धोरण अवलंबून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही बोलल्या जात आहे.
    
मागील काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. अशातच भालेवाडी येथील नागरिकांना मागील चार दिवसांपासून पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. यास पूर्णतः कारणीभूत ठरत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत नागरिकांत असंतोष खदखदत आहे. नागरिकांना मूलभूत गरजेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करून रोजंदार यास हटविण्यात यावे व नागरिकांना पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती च्या दरबारातच ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.