सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (१६ ऑगस्ट) : मारेगाव नगरपंचायत अंतर्गत शहरातील निकृष्ट कामाच्या विरोधात प्रभाग क्रं. आठ मधील नागरिकांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तथा कंत्राटदार यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दि. १५ ऑगस्ट २०२१ पासून 'घंटानाद आंदोलन' नगरपंचायत कार्यालय समोर सुरू करण्यात आले. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांनी संयुक्तरित्या फीत कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत आंदोलनाला सुरुवात झाली.
शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे बांधकाम नियमाला तिलांजली देत काम करण्यात आले. रस्त्याच्या वास्तव व इष्टीमेटला बगल देत या रस्त्याच्या कामात दर्जा नसून निकृष्ट काम करण्याचा सपाटा सुरू आहे. या बोगस कामात येथील मुख्याधिकारी आणि अभियंता भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.
दरम्यान, शहराच्या अनेक प्रभागात थातूरमातूर कामे उरकविण्याचा सपाटा सुरू करण्यात आला. येथील प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराची पूरती वाट लावण्याचे षडयंत्र चालविले असल्याचा नागरिकांककडून घणाघाती आरोप होत आहे. अनेक ठिकाणचे रस्ते अवघ्या दिवसात सिमेंट, गिट्टी उखडून खड्डे पडले आहे. त्यामुळे शहरातील निकृष्ट कामाची क्वॉलीटी कंट्रोल बोर्डा कडून सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करीत निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी येथील गजानन चंदनखेडे, शब्बीर पठाण, मारोती देवाळकर, विनोद बदकी, बंडू मत्ते, दिनेश सरवर, राजू बदकी, मनोज पेंदोर, यांचे सह नागरिकांनी घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलन कर्त्यानी घंटा वाजवत 'प्रभागाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात' जिल्हाधिकारी साहेब न्याय दया..! या घोषणेने येणाऱ्या जाणाऱ्यां अनेकांचे लक्ष वेधले. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत रोज सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत 'घंटानांद आंदोलन' चालू ठेवु अशी ठाम भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली.
सदर आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने च्या उपस्थितीत आंदोलनाला प्रारंभ झाला असून, यावेळी दोन्ही संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.