सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (२२ जुलै) : निंबाळा येथील पक्क्या घराची भिंत खचली. सुदैवाने या घटनेत मजूर कुटुंब थोडक्यात बचावले. मंगळवारी रात्रीपासून च पावसाला सुरुवात झाली असून सतत च्या पावसामुळे निंबाळा येथील रहिवाशी शेतमजूर पिसाराम गणपत उईके यांच्या घराची भिंत कोसळली आहे.
उईके दाम्पत्य मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीतात. अशातच २१ जुलै ला सकाळ पासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली. दोघेही पती पत्नी जेवण करीत असताना त्यांच्या घराची भिंत अचानक खचली. भिंत बाहेरच्या भागाने पडल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, पावसाच्या दिवसात घराची भिंत कोसळल्याने हे कुटुंब उघड्या वर पडले असून त्यांची राहण्याची पंचायत झाली आहे. यावेळी उईके यांची परिस्थिती बघता गावाकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत त्यांच्या घरावर ताडपत्री टाकून पावसापासून संरक्षण होण्याची व्यवस्था केली. अशा परिस्थितीत प्रशासनाने या शेतमजूर दाम्पत्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.