सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (२५ जुलै) : मारेगाव शहरातील बसस्थानक व्हावे या आग्रही मागणीसाठी भाकप गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे बसस्थानकाला जागा मिळाली परंतु बसस्थानक बांधकाम प्रलंबित आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाही असा सवाल कॉ. बंडू गोलर यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.
परिवहन विभागाची जागा असून सुद्धा बसस्थानक बांधले जात का नाही असा थेट आरोप त्यांनी स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधी वर केला होता. मागील स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भाकपच्यावतीने बसस्थानकाच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदार बोदकुरवार यांनी आंदोलकाशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. कोरोना संपताच आमदार निधीतून १० लाख रुपयाचा निधी बसस्थानकाच्या शेडकरिता देणार असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. कोरोना ओसरला, परंतु लोकप्रतिनिधिंना विसर पडला का? असा असा सवाल करीत त्यांनी दि.२४ जुलै ला मा. आमदार साहेबांना संपर्क साधून १५ ऑगस्ट ला आंदोलनाची तयारी असल्याची आपल्या भूमिका मांडली. आश्वासनाला एक वर्ष होत आहेत, बस स्थानक बांधकाम केव्हा सुरु करणार याबाबत अर्धा तास थेट मोबाईलद्वारे संवाद साधून चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते सांगतात,
परिवहन विभागाची जागा आहे पण.. प्रवाशीयांना थांबण्याकरिता त्या जागेवर बसस्थानक नाही, तेव्हा आपण कधी बांधणार आहात,असे खनकावून बोलल्या नंतर मा. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी निधी उपलब्ध झाल्यानंतर २६ जानेवारी च्या अगोदर उदघाटन करून बांधकाम सुरु करण्याचे निश्चित केले. मात्र, तो पर्यंत वाट बघुत अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन सुरु करू असे कॉ. बंडू गोलर (भाकप) यांनी सांगितले आहे.