सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तेराव्या शतकातल्या संत नामदेव महाराजांचे विचार आजही अनुकरणीय आहेत. त्यांचं कार्य हे सार्वकालिक आहे. वारकरी धर्माच्या उभारणीत आणि विस्तारात यांचा सिंहाचा वाटा आहे. असे प्रतिपादन साहित्यिक तथा वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. तालुक्यातील जळका येथे संत नामदेव महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सव साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक ढाले आणि आयोजक कुंतलेश्वर तुरुवले उपस्थित होते.
संत नामदेव महाराजांनी केलेल्या विविध कार्याचे दाखले सुनील इंदुवामन ठाकरे यांनी दिलेत. तसेच त्यांच्या जीवनचरित्रातील काही प्रसंग देखील सांगितलेत. संत नामदेवांनी अभंगांतून विविध संतांच्या समाधीचे वर्णन केले. तीर्थावळीच्या अभंगांतून प्रवास वर्णनही केले. अशा विविध विषयांवर ठाकरे यांनी चर्चा केली. संत नामदेव महाराजांची मूर्ती कुंतलेश्वर तुरविले यांच्या पुढाकारातून 2016 साली स्थापन झाली. यावर्षी पहिल्यांदाच इथे संत नामदेव महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा झाला.
या कार्यक्रमाचे संचालन चैतन्य तुरविले यांनी केले. आभार अमित उपाध्ये यांनी मानले. रविवारी घटस्थापना झाली. सकाळी अभिषेक झाल्यानंतर दिवसभर भजन झाले. गोपाळकाला आणि महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.
आयोजनासाठी भास्कर ढाले, संजय कोहळे, संजय तुरविले, सुनील तुरविले, रुद्रेश्वर तुरविले, ज्ञानेश्वर उज्वलकर, मोरेश्वर तुरविले, प्रभाकर जवंजाळ, वैशाली तुरविले, प्रांजली ढाले, वर्षा तुरविले आणि गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.