सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी अवैध रेती तस्करी व अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जन आंदोलन वणी विधानसभा यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामीण परिसरात चालणारा अवैध व्यवसाय निवडणुकीच्या काळात प्रभाव टाकू शकतो. या अवैध धंद्यांमधून कमावलेल्या पैशाच्या जोरावर काही मंडळी मतदारांवर दबाव, दहशत किंवा आमिषे निर्माण करतात, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पावित्र्य धोक्यात येते, असा आरोप करण्यात आला आहे.
आंबेडकरी जन आंदोलनाने केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:• शिंदोला,तरोडा व कायर,शिरपूर जिल्हा परिषद सर्कलमधील अवैध रेती तस्करी तातडीने थांबवावी.• अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई करावी.• 18/11/2025 व 20/11/2025 रोजी झालेल्या कारवाईत ज्यांची नावे समोर आली आहेत त्या सर्व रेती तस्करांवर गुन्हे दाखल करावेत.• मुंगोली खाणीतील सायलो परिसरात व महालक्ष्मी कॅम्पजवळ जप्त झालेला रेतीसाठा वेकोलीच्या हद्दीत असल्याने, रेती तस्करीसाठी वेकोली प्रशासन जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
या मागण्यांसह शांत, सुरळीत आणि दहशतीपासून मुक्त निवडणूक व्हावी यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त अनिल तेलंग, मुख्य संयोजक, आंबेडकरी जन आंदोलन, वणी यांनी केली आहे.
निवेदनावर अनिल तेलंग सह सुनील पारखी,रितेश भगत,मोबीन शेख, प्रदीप मून, संजय कांबळे यांच्या सह्या आहेत.