सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील नांदेपेरा देवी स्टॉप ते मच्छिन्द्रा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाल्याने वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः मच्छिन्द्रा ते नांदेपेरा रस्ता खड्ड्यांनी झाकला गेल्याने चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरून जाताना उडणाऱ्या धुळीमुळे समोर काहीच दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गाकडून या रस्त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “रोजच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो,” असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बंदी असूनही या मार्गावर जड वाहतुकीची वर्दळ सुरूच असल्याने खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.