सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यात विजेचा लपंडाव होत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संबंधित कनिष्ठ अभियंता ग्रामीण काकडे यांच्या कडून होत असलेल्या त्रासाबाबत नागरिक कंटाळली अशा आशयचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव चे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या उपस्थितीत उपकार्यकारी अभियंता, मारेगाव यांना देण्यात आले आहे.
वरून राजाने आठ दिवसापासून हुलकावणी दिल्याने पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. मात्र तालुक्यातील विजपुरवठा लपंडाव करत असल्याने पिकांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.
मे महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी जुनच्या पहिल्या आठवडयात कापूस, तूर खरीप पिकांची पेरणी केली. परंतु अचानकपणे पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहेत. पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. सिंचनाची सुविधा असताना कनिष्ठ अभियंता ग्रामीण काकडे हे ग्राहकांना अपमानाची वागणूक देत असल्याचा आरोप तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी निवेदनातून केला आहे.
पुढे निवेदनात असंही म्हटलं आहे की, त्यांचा फोन बंद असतो,आणि फोन उचलला तर तुमच्याने जे होते ते करून घ्या नाहीतर माझी तक्रार करा अशी उत्तरे ते देतात. अनेकदा 10/10 दिवस विजपुरवठा खंडित होत असतो असंही म्हटलं आहे. पगारी कर्मचारी असल्यामुळे आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे, वरिष्ठानी त्यांच्यात सुधारणा करावी अशी मागणी काँग्रेस चे पदाधिकारी वं कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, आकाश बदकी, समीर सय्यद, अंकुश माफूर, विनोद आत्राम यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.