तरुण शेतकऱ्याची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची धग थाबता थांबेना. ऐन बडग्याच्या दिवशी 3 सप्टेंबर ला सायंकाळी 6 वाजता च्या दरम्यान पठारपूर येथील एका तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे.

सुनील भाऊराव उलमाले (३५) असे त्याचे नाव असून यांनी आपल्या राहते घरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची दुःखद घटना उघडकीस आली.

सुनील याने विषारी द्रव प्राशन केल्याचे नातेवाईकांना कळताच त्यांनी प्रथम कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र,प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारार्थ वणी येथील ग्रामीण रूग्णालयात रात्री दाखल केले असता डॉक्टरांनी तपासूणी करून त्याला मृत घोषित केले. त्याच्या अशा अकाली निधनाने पठारपुर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुनील कडे चार एकर शेती आहे. त्याचसोबत मक्त्याने शेती केली होती. सुनील यांनी एकदम आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का? उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे.

मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.