सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : शहरातील विद्यानगरी परिसरात मागील आठ दिवसापासुन पाणी पुरवठा बंद असल्याने,संपुर्ण विद्यानगरी परिसरात पाण्याची भिषण पाणी समस्या उद्भवली असताना नगर परिषद प्रशासनाला अजुन पर्यंत पाणी समस्या सोडवण्यात यश आले नसल्याने स्थानिक नागरिकांध्ये तिव्र रोष व्यक्त होत आहे.
विद्यानगरी परिसरात स्वर्णलिला स्कुल जवळ असलेल्या बोरवेल मधुन मागील विस वर्षापासुन पाणी पुरवठा होत आहे. परंतु बोरवेलच्या क्षमतेनुसार विद्यानगरी परिसराला, पाणी पुरवठा करण्याकरीता परिसरात ३० हजार लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचे निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे विद्यानगरी येथील नागरिकांना मागील कित्येक वर्षापासुन सुरळीत पाणी पुरवठा होत होता. मात्र,मागील काही कालावधित विद्यानगरी परिसरात गृहनिर्माण कार्य झाल्याने, परिसरातील घरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एका बोरवेलच्या सहाय्याने शेकडो घरांना पाणीपुरवठा होणे कठीण झाले आहे. त्यामुळे कित्येक रहिवाशी पाण्यापासुन वंचित राहत असल्यामुळे परिसरात अतिरिक्त पाण्याच्या टाकीची गरज निर्माण झाली आहे.
एकंदरीत मागील आठ दिवसापासुन विद्यानगरी परिसरातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे विद्यानगरी येथील नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाबद्दल तिव्र संतापाची लाट आहे. त्यातच मागील आठ दिवसापासुन स्वर्णलिला स्कुलपासुन पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
मात्र, बघ्याची भूमिका घेत असलेल्या नगर परिषद प्रशासनाला अजुन पर्यंत कुठलाही हालचाली नाही. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने यावर त्वरित उपाय-योजनाकरुन तोडगा न काढल्यास विद्यानगरी परिसरातील नागरीक तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार असल्याचे माध्यमाशी बोलतांना विद्यानगरीचे अध्यक्ष अशोक चौधरी, सचिव भाऊ आसुटकर, प्रकाश धुळे, मेश्राम सर, पायघन सर, मडावी सर यांनी सांगितले आहे.