मारेगाव : तालुक्यात वारंवार विजेचा लपंडाव आणि अघोषित लोडींग, यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगलाच फटका बसत आहे. शेतातील उभे पिक सुकत आहे. विजेवरील छोटे-मोठे उद्योगही सणासुदीच्या पर्वावर मोकळीस पडतांना दिसत आहे. परिणामी शेतकरी, लघु उद्योगदार आर्थिक अडचणींचा सामना करित असताना याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी ला निवेदन सादर करून विजेचा पुरवठा 24 तास, लोड शेडींग बंद करण्याची मागणी केली होती, यासह इतरही मागण्या होत्या. परंतु जगाच्या पोशिंद्यच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने अखेर काँग्रेस कमिटीच्या वतीने 23 ऑक्टोबर पासून स्थानिक महावितरण कंपनी च्या विरोधात मार्डी चौकातील पेट्रोल पंपासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र, संबंधित विभागाने तीळमात्र दखल घेतली नसल्याने उपोषण आणखी लांबले असताना काल रात्री त्यातील उपोषणकर्ते तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांची प्रकृती खालावली, त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे माहिती आहे. त्याच बरोबर कृ. उ. बा. समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा यांची सुद्धा प्रकृती खालावण्याचे संकेत आहे. परिणामी हे आमरण उपोषण आणखी न लांबता ताबडतोब संबंधित विभागाने दखल घेऊन मागण्या मंजूर कराव्या,असे मत जण सामान्यांतून उमटत आहे.
दरम्यान, तीन दिवसापासून सुरु असलेल्या आमरण उपोषणास अनेक राजकीय सामाजिक तथा सामान्य नागरिक या उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवीत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कुंभकर्णी महावितरण कंपनी ला जागे करण्यासाठी आज तिसऱ्या दिवशी सुद्धा आमरण उपोषण सुरु असताना असंख्य शेतकरी शेतमजूर ओघ उपोषण मंडपी भेट देऊन आपला रोष महावितरण विरोधात व्यक्त करत जाहीर पाठिंबा दर्शवित आहे.