पांढरं सोनं काही वेळात झाले काळं


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

मारेगाव : तालुक्यातील लाखापूर येथील दोन युवा शेतकऱ्याचे पांढरं सोनं काही वेळात काळं झाले. ही घटना आज दुपारी 2 ते 2.30 वा. च्या दरम्यान, घडली. सदर  शेतकऱ्यांचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे.

मारेगाव तालुक्यातील लाखापूर येथील युवा शेतकरी प्रवीण बलकी यांच्या मालकीचे कापूस घरात जागा नसल्याने बाहेर अंगणात साठवून ठेवण्यात आला होता, आज गुरुवार दि.2 फेब्रुवारी ला दुपारी 2 ते 2.30 वा. च्या दरम्यान अचानक कापसाला आग लागली. कापसाला आग लागल्याचे लक्षात येताच आग पाण्याने विझवण्यात अली. परंतु तोपर्यंत प्रवीण बलकी यांचा अंदाजे नऊ ते दहा क्विंटल कापूस जळाला. तसेच त्यांचे लहान बंधू जगदीश माधव बलकी यांच्या ही मालकीचा अंदाजे जवळपास पाच क्विंटल कापूस जळाला असल्याचे समजते. सध्या कापसाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार भाव वाढेल या आशेने राखून ठेवला आहे. आज कापसाचा भाव वाढेल, उद्या कापसाचा भाव वाढेल म्हणून दोनही शेतकऱ्यांनी जागा नसल्याने अंगणात कापूस साठवून ठेवला आहे, मात्र अचानक आग लागली आणि दोन सख्या भावाचा कापूस जळाल्याने मोठे नुकसान झाले असून, युवा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहे. अतिवृष्टी मुळे आधीच शेतकरी हतबल झाला असतांना शेतकऱ्यांना आणखीन या आगीमुळे आर्थिक फटका बसला,अंदाजे प्रवीण यांचा दहा क्विंटल तर जगदीश यांचा पाच क्विंटल कापूस जळाला. दोघा मिळून अंदाजे 1 लाखाच्या वर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

सदर घटनेबाबत स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाला कळविण्यात आले, परिणामी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.