सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (ता.३) : तालुक्याचे कार्यालयीन महत्वाच्या कामाचे एकमेव ठिकाण म्हणजे तहसील कार्यालय. विविध महत्वाचे कामं इथेच करावी लागतात. मात्र, गेल्या अनेक महीन्यापासून मारेगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार नसल्याने मुख्य तहसीलदार यांच्यावर संपूर्ण तहसील कामकाजाचा भार पडला असल्याचे दिसून येते.
मारेगाव तहसीलमध्ये नायबतहसीलदार यांच्या तीन ही जागा रिक्त असल्याने सर्व कामे तहसीलदार दिपक पुंडे यांनाच करावे लागत असून त्यांच्यावर अधिकचा भार पडत आहे. त्यामुळे तहसीलमध्ये आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची हेडसांड होत आहे. प्रशासनाने रिक्त जागा त्वरित भरल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो असे जनमानसात बोलल्या जात आहे.
३१ मार्चला निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार व्ही.बी दासरवार हे सेवानिवृत झाल्याने तहसील कार्यालयाचा कारभार एका नायब तहसीलदारांवर आला होता,परंतु तेही महिन्यापासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती आहे. नायब तहसीलदार नसल्याने वणी येथील नायब तहसीलदार यांचेवर मारेगावची जबाबदारी देण्यात आली. परंतु त्यांच्याकडेही अतिरिक्त भार असल्याने ते मारेगावकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना मधील अनेक लाभार्थ्याचे प्रकरणे प्रलंबीत असल्याने लाभार्थी त्रस्त आहे. तसेच शेतीचा खरीप हंगाम सुरू झाला असून अनेक गावातील पांदण रस्ता आहे, नवीन शैक्षणिक सत्र काही दिवसातच सुरू होईल. त्यात विद्यार्थ्याच्या महत्वाच्या कागदपत्रावर ऑनलाईन स्वाक्षरी करणे, महसुल विभागाची कामे, शेतकऱ्यांना कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्राचे फेरफार यामुळे एकट्या तहसीलदारावर भार आला असून एकटे हे सर्व शेकडो प्रकरण कशा पद्धतीने निकाली काढणार हा प्रश्नच आहे. जनतेच्या कार्यालयीन कामाचा निपटारा करण्यासाठी तीन नायब तहसीलदार पदे भरणे गरजेचे आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीने लक्ष देऊन तहसील कार्यालयात जनतेची होणारी परवड थांबवावी अशी आग्रही मागणी आहे.
"मारेगाव येथे चार नायबतहसीलदार यांचे पदे आहे. त्यापैकी तीन पदे रिक्त असून एक नायब तहसीलदार आहे. परंतु ते वैद्यकीय रजेवर गेलेले आहे. मारेगाव येथे नायबतहसीलदार यांचे पदे भरल्यास कामे करण्यास सोयीस्कर होईल."
-दिपक पुंडे
तहसीलदार मारेगाव