सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील खंडणी गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या जानकाईपोड (मेंढणी) येथे मूलभूत पाणी सुविधेत काही नागरिकांकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात नागरिकांनी प्रशासन दरबारात ठाण मांडून समस्या तातडीने सोडवण्याची मागणी लावून धरली.
येथील विहिरीतील पाणी वापरण्यास मनाई करणे, जलवाहिनीची तोडफोड करणे तसेच ग्रामस्थांना धमकाविण्याचे प्रकार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे शतकापासून वास्तव्य असलेल्या या गावातील नागरिक नियमितपणे मालमत्ता कराचा भरणा करीत असतानाही त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करून ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे पाणी व मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती गौरकार, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, दयाल रोगे, नंदू खापणे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार सादर केली. ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.