ग्रामीण भागातील विकास कामाचा दर्जा घसरला
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यात गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. सदरील कामे नामधारी एजन्सीकडून होत असुन, प्रत्यक्षात राजकीय गुत्तेदार आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने होत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाचा दर्जा तपासणारी यंत्रणा, अभियंता हे दुर्लक्ष करीत असल्याने विकास कामाच्या गुणवत्तेचा दर्जा तपासायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. गाव पातळीवर होणारी विकास कामे स्थानिक ग्राम पंचायत या एजन्सी मार्फत केल्या जाते, लोकप्रतिनिधींनी विकास कामाचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्तापूर्वक करून घेणे अपेक्षित असते, परंतु या कामाचे गुत्तेदार लोकप्रतिनिधीच बनले असल्याने अनेक विकास कामात अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तक्रारी असलेल्या विकास कामाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यात मूलभूल सुविधांचा अभाव आहे. रस्ते, विज, पाणी, नाली बांधकाम, स्मशान भूमीसह इतरही भौतिक मूलभूत सुविधेसाठी ग्रामीण भागातील जनता झगडत आहे. दरवर्षी या सुविधेसाठी सरकार करोडो रुपयाचा निधी देवूनही दुय्यम दर्जाच्या विकास कामामुळे गाव पातळीवरील समस्या सुटल्या नाहीत, हे वास्तव चित्र तालुकाभरात पाहावयास मिळते. तालुक्यात अधिकृत कंत्राटदार व एजन्सी नामधारीच असून त्यांच्या नावाने लोकप्रतिनिधी व ग्राम अधिकारी गुत्तेदारिने अनेक गावात विकास कामे करत असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा दिसून येतो. त्यामुळे सहा महिने पुर्वी झालेल्या विकास कामाची वाट लागलेली दिसून येते. शासनाने ज्या अभियंतावर कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी सोपविली आहे. ते कामाच्या गुणवत्तेपेक्षा कशावर नजर ठेवून असतात, हा प्रश्न मात्र या ठिकाणी अनुत्तरीत आहे. ग्रामीण भागात होत असलेल्या विकास कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ठ दर्जाची दिसून येते, इस्टिमेट नुसार कामे होत नाही.थातुरमातुर कामे केली जातात. मात्र कामाच्या गुणवत्तेची तपासणीकरीता राजकीय दडपण आणि मायामोह या धोरणामुळे मूल्यमापन करणारे अभियंते आणि देयके काढणारे अधिकारी विकास कामाची पाहणी न करता वजन पाहून बिल मंजूर करून आपले संबंध जोपासत असल्याची चर्चा होताना एकावयास मिळते. त्यामुळे काम करणाऱ्या एजन्सी ला सगळ्यांची मर्जी सांभाळत विकास कामे करावी लागत असल्याने गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. दर्जाहीन कामामुळे गाव खेड्यातील दिवसागणीक समस्या वाढत आहेत. त्यामुळे गुण नियंत्रक विभागाकडून विकास कामाचा दर्जा तपासून दोषी कंत्राटदार, अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे.अशी मागणी मारेगाव तालुक्यातील जनतेतून केल्या जात आहे.