सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : येथील प्रलंबित एम. आय. डी. सी. चा मुद्दा निकाली काढण्यात यावा तसेच कापसाला 12 हजार क्विंटल भाव देण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांनी आमदार रोहित पवार यांना दिलेले आहे.
सध्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरवात झालेली आहे. सर्वांच्या नजरा युवा आमदार रोहित पवार यांच्यावर खिळलेल्या आहे. कारण रोखठोक व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे एकमेव नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे.
मारेगाव तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षांपूर्वी एम आय. डी. सी. झालेली आहे.परंतु एम. आय. डी. सी. झाल्यानंतर येथील युवकांना व्यवसायासाठी तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. त्यामुळे हा मुद्दा विधानसभेत मांडण्यासाठी,युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांनी आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले.
यवतमाळ जिल्ह्यातंर्गत मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा फलक गेल्या 30 वर्षापासून लागला आहे. हा फलक येथील युवकांना वाकुल्या दाखवत आहे.मात्र, लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे अजून पर्यंत तिथे औद्योगिक प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही.त्यामुळे एमआयडीसीच्या जागेच्या क्षेत्राचे नेमके काय झाले? व एमआयडीसी अंतर्गत औद्योगीक समस्या निकाली काढण्यासंबंधाचे कुठे घोडे अडले?हा प्रश्न आजही अधांतरीच आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातंर्गत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत.याचबरोबर मारेगाव तालुक्यात अनेक उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत. खासदार व आमदार सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीनीही बेरोजगारांच्या समस्यांबाबत संवेदनशील दिसून येत नाही.मग या एमआयडीसी फलकाचे दर्शन दररोज कशासाठी?हा मुद्दा महत्वपूर्ण आहे.
यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो.मात्र या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होताना दिसत आहेत.दिवसेंदिवस कापूस पिकाचा खर्च वाढत असताना,मात्र दरवर्षी भाव तोच राहतो आहे.कापसाचा प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे.
कमीत कमी पर क्विंटल बारा हजार रुपये भाव कापसाला मिळावा ही गंभीर बाब लक्षात घेता,"आमदार रोहीत पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडावा या उद्देशाने,विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांनी निवेदन दिले आहे. आणि मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या समस्यांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्यांना धीर द्यावा अशी विनंती पुर्वक अपेक्षा व्यक्त केली आहे. आमदार रोहीत पवार यांनी निवेदन स्वीकारले असून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनसुद्धा दिले आहे.