कापसाचे भाव कोसळले, शेतकरी सापडले आर्थिक अडचणीत


सह्याद्री चौफेर | वृत्संस्था 

मारेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कापूस आणि बाजारात कापसाला मिळणारा भाव.

एका अर्थाने वैदर्भीय शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच अवलंबून कापसावर अवलंबून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मागील वर्षी कापसाला दहा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. परंतु अतिवृष्टी मुळे म्हणावे तसे उत्पादन काही मिळाले नाही.

डिसेंबर जानेवारी मध्ये साधारणपणे कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपये क्विंटल इतका दर होता. परंतु मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कापसाला चांगले दर मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी कापुस साठवून ठेवला.परंतु झाले मात्र उलटेच. सध्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये एवढाच दर मिळत आहे.

आता मे महिना संपत आल्याने खरीपाच्या तयारी साठी कापुस विकणे शेतकऱ्यांना क्र'मप्राप्त आहे. सोबतच वातावरणातील वाढलेल्या उष्म्यामुळे घरात साठवून ठेवलेल्या कापसापासून अंगावर लाल चट्टे येणे, खाज सुटणे अशा समस्या भेडसावत आहे. लहानग्यांना तर हा त्रास खूप जागवत आहे. काही घरांत तर काहीही करा पण आधी कापूस विका असा गृहिणींचा स्वर ऐकायला मिळत आहे. 

खरे तर शासनाने या प्रकरणात लक्ष घालून जगाच्या पोशिंद्याला दिलासा देणं गरजेचे आहे. मात्र, असे होतांना कुठे दिसत नाही. तसेच यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, यांनी सुद्धा पुढाकार घेणं आवश्यक आहे.