निरोगी शरीरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : आपले पूर्वज आणि वडीलधारी मंडळी रानभाज्याचे महत्व जाणत होते. मात्र आजच्या पिढीला रानभाज्यांची ओळखही नाही. शरीरातील विविध आजार दूर करण्याचे औषधी गुण रानभाज्यांमध्ये आहेत, प्रचंड पौष्टिक तत्व शरीराला यातून मिळतात. निरोगी शरिरासाठी रानभाज्यांचे महत्व अनन्यासाधारण असून नागरिकांनी रानभाज्यांची ओळख आणि त्यातील पोषक तत्वांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी केले.
प्रकल्प संचालक आत्मा तसेच तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त रानभाजी महोत्सव कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, आत्मा समितीच्या सदस्य रेणू शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मानवी आरोग्यासाठी सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व असल्याने विविध भाज्यांचा आहारात समावेश आवश्यक आहे. सद्यस्थितीत रानातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे , रानफळांचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी विविध रानभाज्या शोधून या महोत्सवामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिल्या त्यासाठी शेतकऱ्यांचे संजय राठोड यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राणभाज्यांचे महत्व शेतकऱ्यांनी नागरिकांना पटवून देण्याचे सांगितले तसेच नागरिकांनीही राणभाज्या खाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले.
यावेळी रानभाज्यांचे महत्त्व आणि उपयोग तसेच पाककृती याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांनी लावलेल्या स्टॉलचे पाहणी करून भाज्यांची माहिती घेतली.
रानभाजी महोत्सवात विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानावनात नैसर्गिकरित्या उगवलेले आघाडा, तरोटा, अरबी, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, कटूरले, शतावरी, भुई आवळा, सुरण, कमळकाकडी, कपाळफोडी गुळवेल, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, वावडिंग, शेवगा, उंबर, आदी रानभाज्या व रानफळांचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते.