सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२४ ऑगस्ट) : पुरोगामी महाराष्ट्रात आजही दुर्गम भागात अफवा व जादू टोण्यावर नागरिक अंध विश्वास करतात, मात्र या अंधविश्वासाला बळी गेल्याने अनेक नागरिकांना त्रास देण्याचे काम अंधविश्वासू नागरिकांनी केलं आहे व करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडी भागातील दुर्गम भाग म्हणजे जिवती गाव, या गावातील वणी (खुर्द) भागात शनिवारी माणुसकीला कलंकित करणारी घटना घडली आहे.
गावातील काही कुटुंब जादूटोणा करतात असा संशय नागरिकांना होता, मोहरम च्या सवारी दरम्यान काही महिलांच्या अंगात भानामती आली असल्याचा प्रकार घडला, त्यांनी गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असे सांगितले व लगेच अन्य दलित कुटुंबातील सदस्यांनी अन्य लोकांच्या मदतीने कसलाही विचार न करता त्या कुटुंबियातील सदस्यांना बांधून मारहाण केली.
इतकेच नव्हे तर त्या सर्वांना भर चौकात लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारझोड केली, ह्याप्रकरणाची माहिती जिवती पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिवती पोलीस स्टे. येथील कर्मचारी घटनेत जखमी झालेला नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीत 7 जण जखमी झाले असून ज्यामध्ये शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी वेळीच गावात धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. असून पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी आरोपीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत 13 आरोपींना अटक केली असून गावात सध्या अ.नि.स. च्या कार्यकर्त्यांनी पोहचून गावकऱ्यांचे समुपदेशन करणे सुरू केले आहे.
घटनेचा पुढील तपास चंद्रपूर पोलीस विभागामार्फत जिवती पोलीस स्टे. करीतआहे, पोलीस निरीक्षक अंबिके यांनी अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.