सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मारेगाव शहरात बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिक, सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
रॅलीची सुरुवात नगरपंचायत, मारेगाव येथून झाली. त्यानंतर मार्डी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्व. बाळासाहेब ठाकरे चौक मार्गे रॅली पुन्हा नगरपंचायत येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या रॅलीत देशभक्त विविध सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला. तसेच शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांमुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उद्देश नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे आणि राष्ट्रध्वजाशी प्रत्येक भारतीयाचे नाते अधिक घट्ट करणे हा आहे. यंदा हे अभियान ९ ते १७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मारेगावात ही तिरंगा रॅली उत्साहात पार पडली.