राजूर येथील वार्ड नं. ३ मध्ये नालीचं नसल्याने साचून राहते रस्त्यावर पाणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१० जुलै) : राजूर येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचून रहात असल्याने नागरिकांचे जाणे येणे कठीण झाले आहे. मागील अनेक वर्षापासून या वार्डात नाली बांधून देण्याची ओरड होत असतांना लोकप्रतिनिधी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. नालीच्या प्रश्नाला घेऊन नागरिक आग्रही झाले आहेत. नागरिकांनी नाली बांधून देण्याची मागणी करीत सरपंचांना निवेदन दिले आहे. 

राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये अजूनही मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. या वार्डातील नागरिकांच्या जाण्या येण्याच्या प्रमुख रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रहात असल्याने त्यांचा चांगलाच मनःस्ताप होत आहे. रस्त्यालगत घरे असलेल्या रहिवासीयांचे तर घराबाहेर निघणेच कठीण झाले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना जाणे येणे करावे लागत आहे. जलमय रस्त्यावर जलचर प्राणी आढळू लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दैनंदिन वस्तूंची खरेदी करण्यास जाणेही कठीण होऊन बसले आहे.
मागील अनेक वर्षांपासून या वार्डात नाली बांधून देण्याची मागणी होत आहे. पण लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. पाणी वाहून नेण्याकरिता नाली नसल्याने रस्त्यावरच तलावाप्रमाणे पाणी साचून रहातं. त्यामुळे नागरिकांना कुठे जाणे येणे तर सोडाच घराबाहेर निघणे सुद्धा कठीण झाले आहे. या समस्येकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. नालीच्या प्रश्नाला घेऊन आता वार्ड क्रं. ३ मधील जनता आग्रही झाली आहे. त्यांनी सरपंच यांना निवेदन देऊन तत्काळ नाली बांधून देण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत नालीची समस्या न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.