सह्याद्री चौफेर | न्यूज
ज्याप्रमाणे बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्यापूर्वी आपल्या कर्तृत्वाने आदिवासी समाजातील प्रत्येक माणसाच्या ह्रदयात आपले नाव कोरलं.
त्याच प्रमाणे बाबुरावजी मडावी यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आजीवन लढा दिला.
एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा साधारण मुलगा आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक आदिवासी आदिवासींच्या गळ्यातील ताईत बनला.
लहानपणापासूनच आदिवासी समाजावर होणारा अन्याय व अत्याचार त्यांनी अनुभवला होता.त्याकाळी आदिवासी समाजाच्या मिटिंगमधे ते सतरंजी टाकणे, पाणी पाजणे, मिटींगच्या सूचना घरोघरी पोहोचविणे हे काम करित नेत्यांची भाषणं आवर्जून ऐकत असतं.
इंग्रजांविरूध्द त्यांच्या ह्रदयात प्रचंड रोष होता. 6 भाऊ व 7 बहिणी असा मोठा परिवार असल्याने प्रत्येकाला शिक्षित करण्याची क्षमता त्यांचे वडील नारायण मास्तर मडावी यांच्याच नव्हती. नारायण मास्तर यांचा जन्म कोरगाव ( आजचा गडचिरोली) जिल्हात झाला.आपली उपजिविका भागविण्यासाठी ते नागपूरला आले. ते त्याकाळात 4 पास होते. इंग्रजी विषयात पारंगत असल्याने त्यांनी “ हितवाद” प्रेस मधे लाईनो-ॲापरेटरची नौकरी मिळाली.पगार कमी कुटुंब मोठं ! त्यामुळे बाबुरावजींनी गोल्फ खेळणाऱ्या इंग्रजांच्या कीट उचलून त्या मोबदल्यात मिळणाऱ्या दोन-आणे मजुरीतून शिक्षण घेत राहिले. पुढे सायन्स कॅालेज मधे लेबॅारटरी असिस्टंटची नौकरी करून त्यांनी पॅालिटेकनिकचा अभ्यास क्रम पूर्ण केला व त्याकाळातील बी. ॲन्ड सी. म्हणजे आजचे सार्वजनिक बांधकाम येथे असिस्टंट ड्रासमनची नौकरी पत्करली.
येथे एक घटना नमूद कराविशी वाटते. नारायण मास्तर म्हणजे त्यांचे वडील हे नौकरी करून आल्यावर आदिवासी मुलांना इंग्रजी शिकवण देत असत.समाजबांधवांना सोबत घेऊन त्यांनी “सायमन” कमिशनला आदिवासींवरिल अन्यायाविरोधात शिष्टमंडळ घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यांचेवर लाठीचार्ज झाला.याचा मोठा प्रभाव बाबुरावजींवर झाला. इंग्रज राजवटीत त्यांनी नागपूरस्थित सदरचे पोलिस स्टेशन जाळले. त्यांचे साथीदार पकडल्या गेले. परंतु अंगकाठीने सबळ व धावण्यात तपळ असल्याने ते इंग्रजांच्या हाती लागले नाही. म्हणून त्यांची स्वातंत्र्यसैनिक ही नोंद नाही.
आदिवासी समाज चंद्रपूरला मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी तेथे जाण्यासाठी बदलीचा अर्ज दिला. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले “ जर बदली नामंजूर करण्यात आली, तर काय करणार “ त्यांनी स्पष्टपणे सांगितले कि, राजीनामा देईन. त्यांची दृढता पाहून मुखर्जीसाहेब अवाक झाले.त्यांची बदली चंद्रपुरला झाली.
नोकरीनंतरचा संपूर्ण वेळ ते, प्रबोधन व कार्यकर्ता जोडण्यात घालवित असतं. नोकरीमुळे मी समाजाला वेळ देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी नौकरीचा राजीनामा दिला. ते त्यांच्या जीवनातील खडतर दिवस होते. चंद्रपूरातील विठ्ठल मंदीर वार्डात शंकरराव चिंचोळकर यांच्या मातीच्या घरात ते सहकुटुंब राहिले. उपासमारीचे दिवस त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांना काढावे लागले. पण ते खचले नाही, अधिक जोमाने ते समाजकार्य करित राहिले.
नागपूरातील श्री. ऋषी मसराम व सी. बीं मडावी ह्यांनी त्यांचे समाजवेड बघुन आपल्या पगारातून काही आर्थिक मदत केली.
(सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतांना स्व. बाबुरावजी मडावी साहेब)
अल्पकाळातच निरंतर दौरे, कार्यकत्यांची मोठी फळी व अभ्यासपूर्ण भाषणांनी तेथील खासदार अब्दुल शफी प्रभावित झाले.त्याआधीच बाबुरावजींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांची भेट घेऊन अत्यंत प्रभावीरित्या आदिवासी समाजाची स्थिती, अन्याय व अत्याचाराची बाजू विषद केली. ते प्रभावित झाले.
हे करित असतांनाच त्यांनी श्री. नारायणसिंह उइके यांचे सोबत “ जबरनज्योत” च्या आंदोलनात उडी घेतली व बघता-बघता त्यांचे पट्टशिष्य बनले.
बाबुरावजींच्या कार्याची दखल स्व. इंदीराजी गांधी घेऊन त्यांना आरमोरीचे आमदारकीचे तिकिट दिले. ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती. कारण त्यांनी कॅान्ग्रेसचे तिकिट स्वत: मागितले नाही.पक्षाने त्यांचे कार्य बघून त्यांना ते देण्यात आले.
ते आमदार म्हणून निवडून आले. विधानसभेत त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली.
त्या काळात “एरिया रिस्टीक्शन” हा आदिवासींसाठी मोठा अडसर होता. गडचिरोली येथील आदिवासी यानांच श्येडुल्ड ट्राईब गणल्या जात असे. उर्वरित आदिवासी समाजाला आरक्षणाचे फायदे, नौकरी व शासकीय योजनांचा लाभ मिळत नसे. बाबुरावजींनी याविरोधात दिल्ली येथे आमरण उपोषण सुरू केले. 19 व्या दिवसाला मरणासन्न अवस्थेत पोहचले असतांना स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पर्यंत ही बातमी पोहचली. त्यांनी स्वत:येऊन त्यांचे आमरण उपोषण सोडविले, व एरिया रिस्टीक्शन हटविले.
त्याकाळात आदिवासी जमिनींची सर्रास लूट केली जात असतांना शिष्टमंडळाद्वारे इंदिराजींची भेट घेतली. जमिन हस्तांतरण कायदा अस्तित्वात आणला.
विधानसभेतील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणात ते नेहमी आदिवासी समाजाचे स्वतंत्र खाते असायलाच पाहिजे, ही मागणी रेटून धरली. त्यांची जिद्द व कळकळ बघून स्व. वसंतदादा पाटील यांनी समाज कल्याण खात्यापासून आदिवासी खाते वेगळे केले व बाबुरावजींनाच त्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार दिला.
बाबुरावजींनी या खात्याचा वेगळा बजेट करून घेतला. आदिवासी विद्यार्थी शिक्षित झाले पाहीजे, या करिता आश्रमशाळा ही संकल्पना त्याचीच होती.
गडचिरोली जिल्हा चंद्रपुरपासून वेगळा करण्यासाठी त्यांना पुन्हा 14 दिवसांचे आमरण उपोषण करावे लागले.हार माणने त्यांच्या स्वभावच नव्हता.
जाती-पडताळणी समिती ही आदिवासी समाजाला दिलेला मोठा दिलासा आहे.
बोगस आदिवासींविरूध्द बाबुरावजींनी सर्व संघटना एकजूट करून “आरक्षण संरक्षण समिती“ निर्माण करून मरेपर्यंत लढा दिला. यासाठी त्यांचे राजकीय जीवन संपविण्यात आले, परंतु त्यांनी हार मानली नाही. आदिवासी समाजासाठी त्यांनी कोणतीच तडजोड केली नाही. मिलिंद कटवाल्यांच विरूध्द खऱ्या हलबा/ हलबी समाजाची संघटना स्थापन करून सुप्रीम कोर्टात केस लढली. येथे एकच लिहावस वाटते कि, त्यांनी तडजोड केली असती तर ते केंद्रीय मंत्री, राज्यपाल किंवा केंद्रात मोठ्या पदावर राहिले असते.
महानगर पालिका नागपूर येथे आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन 7 बोगस नगरसेवक निवडून आले. त्यांच्या विरूध्द केस जिंकून त्यांना नगरसेवक पदावरून खाली खेचण्याचे काम बाबुरावजींनी केले. निवडून आलेल्या व्यक्तिला त्याला पदावतन करणे, हा विश्वविक्रम असावा, असे मला वाटते.
आज त्यांचा जीवनावर काही विद्वान विद्यार्थी पी.एच. डी. करित आहेत. यातचं त्यांचे समाजकार्य सिध्द होते.
एक “विरळ” संयोग माझ्या लक्षात आला .
बिरसा मुडांचा जन्म 15 नोव्हेंबर तर बाबुराव मडावींचा 27 नोव्हेंबर !
बिरसा मुंडाचा मृत्यु 9 जून तर बाबुराव मडावींचा मृत्यु
16 जून !
मला असं वाटते कि, बिरसाचे कार्य पुढे नेण्यासाठीचं बाबुरावजींचा जन्म झाला असावा.
अश्या निस्वार्थी, समाजनिष्ठ, सतत झटणारा, विरोधकांची पर्वा न करणाऱ्या, आदिवासी समाज योध्दाच्या 95 व्या जन्मदिनाच्या समस्त आदिवासी समाजाला शुभेच्छा !
कै. बाबुरावजी मडावी…आदिवासी समाजाचा असामान्य लोकनायक …..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 27, 2022
Rating:
