शेतकरी विरोधी सरकार व कमिशनखोरांना उखडून फेका - संजय देशमुख


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी आज रविवारी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला शहर व ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. टिळक चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना संजय देरकर यांनी एकजुटीने लढू व जिंकू, अशी गर्जना दिली. रॅलीत खा. संजय देशमुख व माजी आ. वामनराव कासावार, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीसाठी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, नेते एकत्र आल्याने रॅलीत महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली.

यावेळी रॅलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, माकप, किसान सभा, संभाजी ब्रिगेड इत्यादी पक्ष व संघटनेचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच रॅलीत मोठ्या प्रमाणात मतदारांचा समावेश होता.

सर्वप्रथम साई मंदिर चौक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राला स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. दु. 1 वाजता जत्रा मैदान येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून रॅलीला सुरुवात झाली. वाजत गाजत व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात वणी शहरातून भव्य मिरवणूक निघाली. 

रंगनाथ स्वामी मंदिरापासून वाजत गाजत निघालेल्या रॅलीत रस्त्यावरील लोकांनी प्रतिसाद देत समर्थन दिले. कुठे रॅलीवर फुलांचा वर्षांवर करण्यात आला. सुमारे एक किलोमीटर लांब ही रॅली होती. रॅली भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, गांधी चौक, खाती चौक असा मार्गक्रमण करीत टिळक चौक येथे पोहोचली. येथे रॅलीचे रुपांतर विराट सभेत झाले. उसळलेला जनसागर पाहून मी निश्चित झालो. आता देरकर यांचा विजय पक्का आहे, असे मनोगत वामनराव कासावार यांनी सभेत व्यक्त केले. 

खा. संजय देशमुख यांनी हे सरकार शेतकरी विरोधी आहे. स्थानिक आमदार हे टक्केवारीचे राजकारण करतात. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 3 लाखांची कर्जमाफी व 25 लाखांचा विमा शेतक-यांना मोफत देण्यात येईल. समाजात तेढ निर्माण करणा-या बीजेपीला उखडून फेका, असे आवाहन त्यांनी भाषणातून केले. 

शेतकरी, बेरोजगार तरुणच जागा दाखवणार - संजय देरकर
शेतमालाला भाव नसल्याने आपल्या विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात. महायुती सरकार राज्यातील उद्योग गुजरातला पळवत आहे. त्यामुळे आपल्या भागातील सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे. महागाईमुळे महिलांचे बजेट बिघडले आहे. यावेळी शेतकरी, बेरोजगार तरुणच भाजप सरकारला जागा दाखवणार. तुम्ही एक संधी दिल्यास शेतकरी, बेरोजगार, महिलांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार, असे मनोगत देरकर यांनी व्यक्त केले.