पेरणी केलेल्या जमिनीचा पटवारी यांच्या मार्फत अहवाल सादर करण्याचे निर्देश द्या - बिसाशेस


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मौजे श्रीरामपूर सहित इतरही गावातील दलीत,आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी शेती साठी अतिक्रमण करून सन 2024 च्या खरिप हंगामात पेरणी केलेली असुन सध्यस्थितीत शेतात पिकं उभी आहेत. परंतु शासन स्तरावरून हस्तलिखित सातबारा लिहणे बंद केल्यामुळे पटवारी परेपत्रक लिहण्यासाठी टाळाटाळ करतात, सातबारा नावावर नसल्याचे कारण पुढे करून दलीत,आदिवासी यानी पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घेण्यापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे दलीत,आदिवासी, भूमिहीन,बेघर, ओबीसी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधनात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शामादादा कोलाम ब्रिगेड चे श्रीरामपुर येथील भास्कर सुरपाम यानी तहसील कार्यालयाकडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.

पुढे असंही म्हटलं की,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे पटवारी यांच्या मार्फत जमिनीचे पंचनामे, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मोका पाहणी, वस्तुस्थिती दर्शक माहिती, गावातील एकूण जमिनिपैकी वाहिती जमिनीचे क्षेत्रफळ, पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घेऊन जमीन कसणाऱ्या बिगर सातबारा शेतकर्याच्या बायना प्रमाणे प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश द्या, अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने पिकं बचाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला. 

यावेळी शामादादा कोलाम ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग टेकाम, भास्कर सुरपाम, गजानन रामपूरे, चरणदास मेश्राम, गंगाराम अत्राम, गोविंदा मेश्राम, सुरेश आत्राम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.