इंडिया आघाडी ही डुप्लिकेट आघाडी आहे-देवेंद्र फडणवीस


सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

राळेगाव : एकीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांची ओरिजनल आघाडी आहे तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार गट यांची डुप्लिकेट आघाडी आहे. ही आघाडी देशाचा कुठलाही विकास करू शकणार नाही, त्यामुळे मतदारांनी ओरिजनल आघाडीलाच मतदान करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव येथे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील
यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये केले.

रविवारी (ता.२१) गांधी ले-आउट येथे ही प्रचार सभा झाली. सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अशोक उईके, संदीप धुर्वे, संजयरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाने, भीमराव केराम, कृष्णराव पांडव, आशिष जयस्वाल, वसंत घुईखेडकर, राजू उंबरकर, जीवन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते, ज्या दिवशी काँग्रेससोबत युतीची वेळ येईल, त्या दिवशी शिवसेनेचे दुकान मी बंद करेल. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची काँग्रेसशी युती करीत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले. सोबतच राज्यानेसुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले.