सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
यवतमाळ : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यासाठी सध्या जोरजोराने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत. शेवटच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांचा भर असणार आहे.
राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत 26 एप्रिलला मतदान होत आहे. त्यानिमित्त शेवटच्या दिवशी राज्यात अनेक नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांची अमरावतीत, तर कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची परतवाडा व सोलापूरमध्ये सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांच्या सभा होतील.