मुलांना मारण्याआधी या गोष्टीचा नक्कीच विचार करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
             
शंतनू दुपारला बारा वाजता शाळेतून घरी परत येतो. शंतनुच पाच वर्षाच वय. मम्मी शंतनुला हात पाय धुवायला सांगते. शंतनू येताच हॉलमध्ये आपलं दप्तर ठेवतो. शंतनू लगेच बाथरूमला जातो. बकेट मधील पाणी पायावर टाकतो आणि बाहेर येतो मग मम्मीनी शंतनु साठी जेवण वाढलेले असते. 
            
मम्मी शंतनुला परत आवाज देते. तसाच शंतनू मम्मी जवळ येतो. शंतनू ताटाजवळ बसतो. मम्मी शंतनूला घास भरवायला लागते. शंतनूच जेवन पूर्ण होते तसाच शंतनु खिडकीकडे वळतो. 
          
खिडकीतून डोकावत असताना शंतनूला सोनू सायकल चालविताना दिसते. असे चित्र दिसल्यावर शंतनु एकही क्षणाचा अवलंब न करता मम्मीकडे जातो आणि म्हणतो मम्मी मला सायकल पाहिजे आहे. मम्मी ऐकते आणि म्हणते बेटा, तुझ्याकडे सायकल तर आहे ना ! शंतनु म्हणतो. मम्मी ती नको दुसरी पाहिजे. ती बघ, बाहेर बोट दाखवत म्हणतो. तशी पाहिजे मम्मी. तेव्हा मम्मी शंतनुला म्हणते, नाही बेटा. आणि मम्मी त्या ठिकाणावरून आतमध्ये चालत जाते. 
          
अशाही वेळेस शंतनुचा हट्ट चाललेला असतो. मम्मी यावर काहीच बोलत नाही. परंतु शंतनूचा हट्ट वाढत चाललेला असतो. त्यावेळी वाढता हट्ट बघून मम्मी शंतनूच्या पाठीवर एक थापड मारते. यावेळेस शंतनुला मम्मीने मार दिल्यामुळे शंतनु मोठ्याने रडायला लागतो. 
             
अशा प्रकारची कृती मम्मीची बरोबर आहे का ? याचा विचार होणही अतिशय महत्त्वाच आहे. बरेचदा असंच होतं आणि बऱ्याच घरी या प्रकारचा उपाय हा वापरला जातोच पण यासारखा उपाय वापरल्याने योग्य तो परिणाम साधला जात असतो का ? 
          
मम्मीने वापरलेला हा मारण्याचा पर्याय बरोबर नाही. कारण मारल्याने मुलांच्या संकल्पना स्पष्ट होत नाही आणि मुलं मारण्याने चूप बसतात असे होत नाही. असं जर वाटत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे. मुलांच्या आग्रहाची अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच मुलांच्या साहित्याची, खेळण्याची, वस्तूची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सर्व मुलांच्या अपेक्षांची पूर्तता करणे हेही पालकांना शक्य नसते. 
          
 म्हणून तर वेगवेगळ्या अनुषंगाने विचार करणे हे कधीही श्रेयसकर. शंतनूच्या मम्मीने या ठिकाणी शंतनूला व्यवस्थित रित्या समजून सांगणे अतिशय महत्त्वाचं होतं. कारण आत्ताची मुलं ही आधिच्या मुलांसारखी बिलकुलच राहिली नाही. ती अधिक समजूतदार झालेली आहे. आताच्या मुलांच्या कुठल्याही गोष्टी लवकर लक्षात येतात. 

मुलांना स्पष्ट व नम्रपणे सांगा-           
या ठिकाणी शंतनूच्या मम्मीने म्हणायला पाहिजे होते की, बेटा तू छोटा आहे. सोनू बघ बरं, तुझ्यापेक्षा किती मोठा आहे. आहे की नाही, आहे ना ! त्यामुळे तो मोठी सायकल चालवू शकतो. तू आता छोटा आहेस. तू आणखी थोडा मोठा झाल्यानंतर तू त्याची सायकल चालवू शकशील. मग तुलाही तशीच सायकल घेऊन देणार. हो की नाही बेटा, काय अशा सांगण्याने शंतनू ऐकली नसती, नक्की ऐकली असती.

आदरपूर्वक संबंध निर्माण करा -
मुलांना भविष्याचे वेध सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे मुलांच्या डोक्यात त्याचे व्यवस्थित टेक्चर निर्माण होईल. म्हणून मम्मी पप्पांनी मारण्यापर्यंत तर जाऊच नये. मुलांनी केलेली मागणी आणि वय तसेच वेळ यांच्याशी तारतम्य साधून पालकांनी व्यवस्थितरित्या त्या गोष्टीला नियंत्रित करणे अतिशय आवश्यक आहे. 
त्यामुळे मुलाच्या मनात कधीच भीतीचे वातावरण पालकाबाबत निर्माण होणार नाही आणि मुलं कुठलीही गोष्ट पालकांना स्पष्टपणे सांगतील.

प्रा. डॉ. दिनेश जारोंडे
पीएचडी. नेट-सेट (मानसशास्त्र),
लेखक प्रशिक्षक मार्गदर्शक समुपदेशक.
संपर्क : 9403257006