सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (२९ ऑगस्ट) : तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी बुरांडा (खडकी) येथील एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. मृतकाचे नाव बळीराम कर्णू धुर्वे (३७) असे आहे.
बळीराम धुर्वे हा बुरांडा (खडकी) येथील रहिवाशी होता. तो ट्रॅक्टर चालक होता. तसेच शेतमजुरीही करायचा. गेल्या १५-२० दिवसांपासून तो गावात नव्हता. शनिवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी तो गावात परतला होता. त्यानंतर रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास तो घरून निघून गेला होता. रविवारी दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान, गावानजीक असलेल्या विनोद चांदवडकर यांच्या शेतातील बंड्यात बळीरामचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बळीरामने गळफास घेतल्याचे कळताच पोलीस पाटील बबन जोगी यांनी मारेगाव पोलीस स्टेशन ला माहिती दिली. मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले,घटनेचा पंचनामा करून मृत्यूदेह शवविछेदनासाठी पाठवला. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप असून रात्री ११ ते १२ दरम्यान, ही घटना घडली असावी असा कयास आहे. बळीराम यांच्या पाठीमागे पत्नी आणि मुलगा आहे.
तर...दुसरी घटना तालुक्यातील रामपूर येथील एका अविवाहित तरुणीने शुक्रवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र, आज तिची प्राणज्योत मालवली. शिवानी महादेव रामपुरे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. रामपूर येथील रहिवाशी होती. शिवाणीने शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही घटना माहीत होताच घरच्यांनी शेजारच्यांच्या मदतीने तिला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तरुणीची तब्येत चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शिवानीच्या मृत्यूचे नेमके कारण कळले नाही.
मारेगाव तालुक्यात दर आठवड्यात सुमारे २ आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहे. मात्र, अद्यापही या गंभीर प्रश्नाकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे.