सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ: जल जीवन मिशन अंतर्गत राज्यभरात भूजल विभाग (GSDA) मार्फत रिचार्ज शाफ्टची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या कामांमुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली असली तरी, मागील दोन वर्षांपासून पूर्ण केलेल्या कामांचे देयक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. यामुळे ठेकेदारांना आर्थिक संकटाचा
सामना करावा लागत असून अनेकांनी शेती, घर तसेच बँकेकडून कर्ज घेऊन ही कामे पूर्ण केली. मात्र थकीत रक्कम न मिळाल्याने व्याजाचा बोजा प्रचंड वाढला असून ठेकेदार आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. शासन केवळ "बघ्याची भूमिका" घेत असल्याचा आरोप ठेकेदार संघटनेकडून करण्यात आला आहे. याच निषेधार्थ आज राज्यभर ठेकेदारांनी एकदिवसीय उपोषण करत शासनाचा तीव्र निषेध नोंदविला.