पुराचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाचा नदीलगत असलेल्या शेतींना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे घोन्सा, शिवणी, चिंचोली, सावंगी, मुंगोली, माथोली, जुगाद, साखरा, कोलगाव, चिखली, टाकळी, येनक, येनाडी, एकार्जुना, शिंदोला, नायगाव, कैलासनगर इत्यादी गावातील शेती प्रभावित झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचा अद्यापही पंचनामा झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा पंचनामा करावा. तसेच शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी निवेदनातून केली. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील शेलु, रांगणा, भुरकी, वडगांव, झोला, कोना, जुनाड, चिंचोली, कवडशी, सावंगी, उकणी या गावांना नेहमीच पुराचा धोका असतो. पूर आला की या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसतो. दोन वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी पावसाचा जोर बघता योग्य ती उपाययोजना तत्काळ करावी,अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. 

निवेदन देतांना पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर, पवन शा. एकरे, तेजराज बोढे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुराचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी पुराचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2024 Rating: 5
Powered by Blogger.