मच्छिन्द्रा येथे खावटी अनुदान योजनेचे जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० ऑगस्ट) : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील ४० लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेचे उर्वरित किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

आदिवासी विभागातील लाभार्थ्याकरिता महाराष्ट्र शासनाची खावटी योजना आदिवासिंना दिनांक २८ ऑगस्ट रोजी गावातील जेष्ठ नागरिक माजी सरपंच श्रीधर पेंदोर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली. मागील चार महिन्यापूर्वी रुपये २०००/- इतके लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा झाले व उर्वरित अंदाजे २०००/- चे अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावशक्य वस्तूंची किट येथील ४० पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. 
या अनुदान खावटी मध्ये मटकी (१किलो), चवळी (२किलो), हरभरा (३किलो), पांढरा वटाणा (१किलो), तूरडाळ (२किलो), उडीद डाळ (१किलो), मीठ (३किलो), शेंगदाणा तेल (१ लिटर), गरम मसाला (५००ग्रॅम), साखर (३किलो), चाय पावडर (५००ग्रॅम), मिरची पावडर (१किलो), असे ऐकून १८ कि. ग्रॅ. प्लस १ लिटर चा समावेश आहे.

अशा कठीण कोरोना काळात आदिवासिंना खावटी योजनेचा लाभ मिळाल्याचे समाधान पात्र लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. अनुदान योजना वाटप करते वेळी गावातील तरुणांनी मदत म्हणून साहित्य उतरवण्यापासून ते वाटप करण्यापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यावेळी हरिदास पेंदोर, बादल कुमरे, सचिन आत्राम, पुरुषोत्तम सोयाम यांनी हातभार लावला.