सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (३१ जुलै) : शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यातून मार्ग काढतांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. वणी गणेशपूर मार्गावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळ मोठं मोठे खड्डे निर्माण झाले असून हे खड्डे बुजविण्याची मागणी होऊ लागली आहे. रहदारीला अडथळे निर्माण करणारे हे खड्डे कित्येक दिवसांपासून दुर्लक्षित असून हे खड्डे तत्काळ बुजविण्याकरिता छत्रपती महोत्सव समिती गणेशपूरच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी तक्रार देऊन दोन दिवसांत नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत हे खड्डे बुजविण्यात न आल्यास याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. वणी गणेशपूर या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळ ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून या खड्ड्यांमधून मार्ग काढतांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून या खड्ड्यांमुळे आठवड्याभरात तीन अपघात झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन खाली पडल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. वणी वरून गणेशपूर मार्गे कायर व घोन्सा रोडवर निघणारा हा शॉर्टकट रस्ता असल्याने हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. छोरीया टाउनशिप कडे जाण्याकरिता हाच जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या प्रमुख मार्गावर नदीच्या पुलाजवळ मोठं मोठे खड्डे तयार झाले असून मागील कित्येक दिवसांपासून हे खड्डे दुर्लक्षित आहेत. हे खड्डे आता अपघाताचे कारण बानू लागले असून दोन दिवसांत हे खड्डे बुजविण्याचा अल्टिमेटम छत्रपती महोत्सव समिती गणेशपूरच्या वतीने देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्यात न आल्यास याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.