Page

...याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्डी ते मारेगाव मोफत बस प्रवास करता येणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : "शब्दाने सहानुभूती मिळवणे सोपे असते. परंतु कर्तुत्वाने मदत करणे हे कठीण काम आहे". अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मात्र,ती म्हण अंगीकारून हे कठीण कार्य जनहित कल्याण संघटनेने करून दाखवत तालुक्यातील मार्डी परीसरातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचं सौदार्य केले आहे.

तालुक्यातील केगांव येथील अनिकेत पिंपळशेडे या सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा आटोने प्रवास करताना अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली होती,तर सर्वत्र तालुक्यामध्ये तीव्र पडसादही उमटले होते. दरम्यान, ही सद्यस्थिती लक्षात घेऊन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या पुढाकारातून, उपाध्यक्ष रॉयल सय्यद, सचिव निलेश तेलंग व समीर कुळमेथे यांनी वणी आगार प्रमुखांची भेट घेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मार्डी ते मारेगाव प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना सोमवार दि.30 ऑक्टोबर पासून पुढील 10 दिवस दिवाळी सुट्या पर्यंत मोफत खासगी बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस सुरु असल्यामुळे व ज्ञानार्जनात विद्यार्थी मागे पडू नये,यासाठी संघटनेचा हा निर्णय व कार्य अभिनंदनासह कौतुकास पात्र असल्याचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. तूर्तास त्यांच्या उदात्त भावनेला नागरिक सुद्धा सलाम करित मारेगाव-मार्डी या डामडौल रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने हाताळण्याचीही आग्रही मागणी होत आहे.


बस सेवा याप्रमाणे उपलब्ध आहेत...

मार्डी ते मारेगाव सकाळी 7 वाजता. (पहिला राउंड)
मार्डी ते मारेगाव सकाळी 10 वाजता. (दुसरा राउंड) 
मारेगाव ते मार्डी दुपारी 1 वाजता. (परतीचा प्रवास)
मारेगाव ते मार्डी दुपारी 3 वाजता. (परतीचा प्रवास)

मारेगाव येथे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वरील प्रमाणे मार्डी मारेगाव बस प्रवास करता येणार आहे. काही अडचण आल्यास जनहित कल्याण संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधावा अशी माहिती तालुका उपाध्यक्ष रॉयल सय्यद, समिर कुळमेथे, निलेश तेलंग यांनी दिली. 

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

जून ते ऑक्टोबर 2023 या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेऐवजी आता 3 हेक्टर मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यात येईल.

त्याचप्रमाणे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादेत मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 2 हेक्टर मर्यादेत मिळेल.

श्रीमती सुशिला दाऊपूरे यांचे अल्पशा आजाराने निधन



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

वणी : श्रीमती सुशिला दाऊपुरे यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार, दि.31 आक्टोंबर 2023 ला पहाटे 5 वाजता निधन झाले आहे. त्यांचे मृत्युसमयी वय 80 वर्षाचे होते. सौ.मंगला गीत घोष यांच्या आई तसेच मा.गीत घोष यांच्या त्या सासू होत.

श्रीमती सुशिला दाऊपुरे यांच्या पच्छात त्यांच्या लहान बहीण श्रीमती कमल ब्राम्हणे तसेच मुली सौ.मंगला घोष, वैशाली वानखेडे, श्रीमती सुषमा धाबर्डे व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आजच म्हणजे मंगळवार 31 आक्टोंबर 2023 ला सायंकाळी 4 वाजता घोंसा येथे होणार आहे. अशी माहिती जावई गीत घोष यांनी दिली. 

येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील कृषी केंद्र बंदची हाक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : कृषि निविष्ठा विक्री करणा-या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलीत असलेले कायदे पुरेशे असतानाही राज्यशासनाकडुन विधेयक क. 40, 41, 42,43 व 44 नुसार पुन्हा नविन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत व त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अश्यक्यप्राय होणार आहे.

राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषि निविष्ठांचे उत्पादन करीत नाही. कृषि विभागाच्या मान्यता प्राप्त कंपनीच्या कृषि निविष्ठा या सिलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतक-यांचा सिलबंद पॅकिंगमध्ये विक्री करीत असल्याने व कृषि विभाग मान्यता प्राप्त सिलबंद निविष्ठाचे दर्जाबाबत कृषि विक्रेत्यांना दोषी समजण्यात येवू नये. तसेच योग्य निविष्ठा विकणारे कृषि निविष्ठा विक्रेत्यांवर जरब बसविणेसाठी अन्यायकारी कायदे विक्रेत्यावर लादू नयेत अशी राज्यातील सर्व विक्रेत्यांची मागणी आहे.

या संदर्भातील निवेदन आमदार सुभाष धोटे, राजुराचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देऊन आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी कृषी केंद्र संचालकांनी केली आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या या जाचक नियम व प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्र दिनांक 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घोषित केला आहे.
या प्रसंगी तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन अध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी सर्वांना आव्हान केले की, कुषी केंद्र संचालक हा नेहमीच शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधांचा पुरवठा करत असतो. त्यांच्या वर शासन जर मोका कायद्या सारखा जाचक कायदा आणत असेल तर ते व्यवसाय करु शकणार नाहीत. त्यांचा व्यवसाय या कायद्यामुळे अडचणीत आला तर शेतकऱ्यांना कोणी ही वाली उरणार नाही शेतकरी देशोधडीला लागेल म्हणून आम्हा सर्व कुषी केंद्र संचालकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही ही महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांना त्रास होणार आहे परंतु या कायद्यामुळे हतबल आहोत. त्यामुळे आम्ही कृषी केंद्र बंदचा निर्णय घेतला आहे.

या प्रसंगी प्रशांत गुंडावार, जिल्हाध्यक्ष ऍग्रो डीलर्स असोसिएशन चंद्रपूर, राजेंद्र चांडक, उपाध्यक्ष ऍग्रो डीलर्स असोसिएशन चंद्रपूर, नंदकिशोर वाढई, अध्यक्ष तालुका ऍग्रो डीलर्स अशोसिएन राजुरा, सुरेश सारडा, उपाध्यक्ष तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन राजुरा, संतोष इंदुरवार, सचिव तालुका ऍग्रो डीलर्स अशोसिएन राजुरा, प्रकाश दातारकर, निखिल चांडक, नेताजी क्षिरसागर, अनिल बोनगिनवार, नितेश गिरडकर, जितेंद्र जयपुलकर, रमेश सारडा, प्रमोद जिवतोडे, डेरकर पाटील, शुभम बेजकीवार, सुधीर कुमार टुडरु, आनंद पडवेकर यासह समस्त तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन राजुरा चे पदाधिकारी व तालुका कुषी केंद्र संचालक उपस्थित होते.

यवतमाळ येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ८८१ कोटी रू. निधीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : गत दीड वर्षांत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना व निर्णयांमुळे युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, वंचित, दिव्यांग आदी सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. 

यवतमाळ शहरानजिक किन्ही गावाजवळ ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

 जिल्ह्यात ८८१ कोटी रू. खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार भरत गोगावले, प्रा. अशोक उईके, किरण सरनाईक, इंद्रनील नाईक, संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोदकुरवार, प्र. विभागीय आयुक्त संजय पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड आदी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, नागपूर या महानगरांशी वेगवान संपर्क होऊन दळणवळण, व्यापार व रोजगार वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात व्हितारा कंपनीसह नामांकित उद्योग सुमारे ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. आदिवासी समाजबांधवांची संस्कृती व गौरवशाली इतिहासाच्या जोपासनेसाठी बिरसा मुंडा वस्तूसंग्रहालय उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. सुपर स्पेशालिटी रूग्णालय येथे पदे लवकरच भरण्यात येतील व ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येईल. वन्य प्राण्यांपासून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी २१ हजार शेतक-यांना ‘सौर झटका’ यंत्रांचे वितरण करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शेतीसाठी आपत्तीकाळातील नुकसानभरपाईचे प्रमाण दुपटीवर नेले आहे. शेतक-यांना एक रूपयात पीक विमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

 सिंचनासाठी गत दोन वर्षांत ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासनाने प्रतिव्यक्ती ६ हजार रू. ची भर घालून अंमलबजावणीला गती दिली आहे. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत देय उपचार निधी दीड लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. 
जिल्ह्यात अभियान कालावधीत १६ लाख नागरिकांना ६०१ कोटी रू. निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात ७५ ‘मॉडेल स्कूल’ सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने महिलाभगिनींसाठी एसटी प्रवास सवलत, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘लेक लाडकी लखपती’ योजना, महिला बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट करणे, तसेच गटांकडून उत्पादित वस्तूंचे ब्रॅडिंग व विपणन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊ, अशीही ग्वाही त्यांनी दिली. 

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्य शासन शेतकरी बांधव, महिला व वंचितांसाठी अनेक योजना राबवत असून, भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंचनाच्या दृष्टीने महत्वाची असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे जिल्ह्यातील अनेक रूग्णांना मदत मिळाली आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांतील रिक्त शिक्षक पदे भरण्याची मागणीही त्यांनी केली. 

खासदार श्रीमती गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.      
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांच्या २५ लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सौर झटका यंत्राच्या प्रात्यक्षिकाचे अवलोकन केले. त्यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कृषी अवजारे, तसेच ट्रॅक्टरच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रास्ताविक केले. 
मंगला माळवे व अमिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आभार मानले.

सौ. रत्नमाला शंकरराव मडावी अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता सौ रत्नमाला शंकरराव मडावी यांचे दुःखद निधन झाले, त्या से.नि.नायबतहसीलदार, विद्यमान नगरसेवक तथा तालुका काँग्रेस सरचिटणीस श्री. शंकरराव मडावी यांच्या पत्नी. तर समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी (गडचिरोली) यांच्या त्या मातोश्री होत्या.

गेल्या अनेक महिन्यापासून त्यांचेवर उपचार सुरु होते. मात्र दीर्घ आजाराने आज पहाटे गडचिरोली येथील हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले. सर्वपक्षीय नेते तसेच शेकडो जनसमुदायाच्या साक्षीने मारेगाव येथील स्मशानभूमीत संध्याकाळी 4 वाजता त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेऊन अनेकांनी शब्दसुमनांजली अर्पित करून श्रद्धांजली वाहिली.

त्यांचा पश्चात पती, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

काँग्रेस पाठोपाठ युवासेनेचे ठाणेदारांना समर्थन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : स्थानिक दुर्गा विसर्जन सुरु असताना शाब्दिक चकमकी दरम्यान जीवे मारण्याची धमकी; कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या रक्षकांना आकारण शिवीगाळ देणाऱ्या नगरसेवकाला पाठीशी घालणाऱ्या भाजप आमदारांनी चक्क ठाणेदाराचीच बदली करा. असा बिनकामाचा आग्रह धरल्याचा आरोप करित तालुक्यातील मनसे, काँग्रेस यांच्या पाठोपाठ आता युवासेनेने ठाणेदार यांना समर्थन देत, मारेगाव ठाणेदार खंडेराव यांची बदली करू नये, अशा आशयाचे निवेदन येथील पोलिसामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज (ता.30 ऑक्टो.) ला देण्यात आले.

शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी स्थानिक दुर्गा देवी विसर्जनानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज असता, पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत त्यांना जीवे मारण्याची धमकी सुभाष नगर दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य तथा भाजप नगरसेवक राहुल राठोड यांनी दिल्यावरून शहरात संतापाचे वातावरण निर्माण असताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या कार्यकर्त्याला पाठीशी घालत ठाणेदार यांची तत्काळ बदली करण्यात यावी, यासाठी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मारेगाव ठाण्यात ठिय्या मांडून कर्तव्यदक्ष ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या बदलीची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना ठाण्यात पाचारण करून रेटून धरली. व पाच तास ठिय्या दिला. मात्र, जीवे मारण्याची धमकी व अकारण शिवीगाळ केल्याने काँग्रेसने या घटनेची तीव्र निंदा करित कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर उलट कारवाई करा व ठाणेदार यांची बदली करू नका अशी मागणी केली होती. 

त्यानंतर ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची नागरिकांप्रती चांगली वागणूक आहे तसेच ठाणेदार हे योग्यरीत्या आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या दबावात न येता मारेगाव ठाणेदार यांची बदली करू नये, अशी आग्रही मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून मारेगाव युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेदार यांच्या प्रती समर्थनाचा ओघ वाढतच असल्याचे चित्र दिवासेंदिवस दिसून येत आहे.

निवेदन देताना युवासेनेचे तालुका अध्यक्ष मयूर ठाकरे, डॉ मनिष मस्की, राजू भाऊ मोरे, लक्ष्मीकांत देठे, रतन धानोरकर, पंकज नेहारे, शुभम कोंगरे, अनिकेत मानकर, यश निब्रड, गजानन ठाकरे, अंकुश जोगी, चंद्रशेखर थेरे, अमोल झोटिंग, अमोल डाहुले तथा युवा सैनिक आदींची उपस्थिती होती.


शेतकऱ्यांना वीज पुरवठा नियमित द्या - शेतकऱ्यांची मागणी

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : पाऊस कायमचा निघून गेल्याने शेतकरी राजा चिंतेत आला असून, शेतातील उभे पिके करपण्याच्या मागावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्याने शेत पिकांना आता पाणी देणे आवश्यक असल्यामुळे शेती पंपाला वीज पुरवठा सुरळीत देण्यात यावा, या मागणीसाठी खैरगांव देशमुख व मोरवा येथील शेतकऱ्यांनी पांढरकवडा अभियंता यांना निवेदन देण्यात आले. 

तालुक्यातील महावितरणच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त असून पाऊस उशिरा आल्यानंतर अतिवृष्टी नंतर पावसाचा खंड, यामुळे आधीच शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यातच काही पाणी असणारे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात विजेची मागणी वाढत असते हे माहीत असताना सुद्धा महावितरण ऑक्टोबर महिन्यात विजेचा पुरवठा सुरळीत करत नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचे विद्युत वितरण साहित्य वापरल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो अपुरे मनुष्यबळ वापरून कंत्राटी लोकांच्या हातात वीज वितरण व्यवस्था दिलेली आहे. खैरगाव देशमुख, मोरवा, वागदा येथील शेतकरी मागील महिन्याभर पासून विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद असते आणि त्यानंतर आलेली विजसुद्धा कमी दाबाचा असते. त्यामुळे फॉल्ट होऊन बीज रात्रभर सुद्धा बंद असते वीज वितरण अधिकाऱ्यांना वारंवार फोनवर सांगून सुद्धा काहीही त्यावर उपाय योजना करत नाही. विज नादुरुस्त झाले तर शेतकरी स्वतः डीपी जवळ जाऊन ऑपरेट करतो हे अत्यंत घातक परिस्थिती आहे.

शेतकरी त्यासाठी प्रशिक्षित नाही आणि तो डीपीवर फ्यूज टाकतो काही अपघात घडल्यास याला महावितरणच जबाबदार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एक निवेदन अभियता महावितरण अधिकारी पांढरकवडा, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, आणि तालूका कृषी अधिकारी कृषी विभाग पाढरकवडा यांना निवेदन दिले. यात शेतकऱ्यांनी सांगितले की, या दोन दिवसात वितरण व्यवस्था दुरुस्त नाही झाली तर, आंदोलनाशिवाय आमच्याजवळ पर्याय नाही हे त्यांनी सांगितले.

आधीच पीक परिस्थिती अत्यंत वाईट अवस्थेत आहे शेतकरी रात्रभर जागा राहून पिकाला पाणी देण्यासाठी शेतात पोहोचतो परंतु विज नसल्यामुळे शेतकरी पाणी देऊ शकत नाही. आणि हे पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या शिवाय पर्याय नाही कारण आतापर्यंत सर्व खर्च होऊन गेलेला आहे आणि त्यांनी पाणी नाही दिले तर पीक वाचू शकत नाही. अत्यंत बिकट परिस्थितीत महावितरण अधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या दूर करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निवेदन देताना संतोष देशटीवार, नितीन बन्तपेलीवार,
अमीर जिवाणी, ज्ञानेश्वर नैताम, मोहन मलेलवार, दिलीप बोमेनवार, प्रकाश शिवणवार, आकाश नाईनवार आदींची उपस्थिती होती. 

समाजकल्याण उपायुक्त डॉ.सचिन शंकरराव मडावी यांना मातृशोक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि.30 ऑक्टोबर 2023 रोज सोमवार ला पहाटे 5 वाजता सौ रत्नमाला शंकरराव मडावी यांचे निधन झाले, त्या माजी नायबतहसीलदार तथा स्वीकृत नगरसेवक श्री. शंकरराव मडावी यांच्या पत्नी सौ.रत्नमाला शंकर मडावी ह्या पत्नी होत, तर समाजकल्याण उपायुक्त डॉ सचिन मडावी (गडचिरोली) यांच्या मातोश्री होत्या.

गेल्या महिन्याभऱ्यापासून त्यांचे वर उपचार सुरु होते. आज पहाटे गडचिरोली येथील हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले.

त्यांचा पश्चात पती, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3.00 वाजता मारेगांव येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. 

वचननामा: स्वतंत्र भारताच्या लोकशाही राजास अर्थात मतदारास विनम्र अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

येत्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी म्हैसदोडका ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा, गावातील नागरिकांच्या समग्र विकासासाठी मी सौ ललिता मारोती तुराणकर आपल्या शतशः आशिर्वादाने "सरपंच" पदाकरिता उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील मानवी हक्कावर आधारित विकास प्रक्रिया राबविण्यात मी कटिबद्ध राहणार आहे. गाव विकासाचा दूरदृष्टीने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत प्रशासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी तथा गावातील नागरिकांच्या सुयोग्य मदतीने आराखडा करावयाचे असल्याची प्रामाणिक व सुबक कल्पना कृतीत उतरवून गाव सर्वांगसुंदर घडविण्याचा माझा मानस आहे.

गाव पातळीवरील पायाभूत सुविधांचा विकास त्यात प्रामुख्याने नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या वीज पाणी, आरोग्य, शिक्षण, वाचनालय, युवकांकरिता क्रिडांगण, रस्ते, नाली सह विविधांगी उपाय योजनेवर मी व माझी टीम भर देऊन सदैव प्रामाणिक प्रयत्न असेल.

ग्राम पातळीवर पक्ष, गट तटाला बगल देवून सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक उपाययोजना आपल्या सहकार्याने व आशिर्वादाने विकासाभिमुख योजना राबविण्यासाठी आणि त्याचा अमल करण्यासाठी हा माझा नियोजित वचननामा...!

मायबाप, भाऊ, ताई आपले अमूल्य मत गाव पातळीवरील विकासाचा वाटा पदरी पाडण्यासाठी मी ललिता मारोती तुरणकर बोध चिन्ह कपबशी या पहिल्या क्रमांकाच्या बोधचिन्हा समोरील बटण दाबून मला व माझ्या संपूर्ण टीम ला आशीर्वाद द्यावा व गाव विकासाचे शिलेदार व्हावे हेच आशिर्वादरुपी मागणं आहे.

उमेदवार - सौ. ललिता मारोती तुरणकर, म्हैसदोडका 

शॉट सर्किट मुळे जुन्या घराला लागली आग, नवरगाव येथील घटना


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथील जुन्या घराला आग लागल्याची घटना आज रविवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान निदर्शनास आली. आग दिसताच शेजाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून शेजारील असलेल्या नातेवाईकांनी सदर आग पाणी झोकून विझवल्याची माहिती आहे.

राहुल पांडुरंग लोणारे यांचे नवरगाव येथील जुने माती कवेलू चे घर आहे. नवरगाव च्या जुन्या घरात जुने सामान, घरेलू साहित्य, लाकडी फाटा तसाच ठेवला असतांना आज रविवार ला सायंकाळी शॉर्ट सर्किट ने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करायच्या अगोदर च शेजारी असलेल्या नातेवाईकांना ही आग निदर्शनास येताच त्यांनी पाणी झोकून सर्व आग नियंत्रणात आणली.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व महावितरण कंपनी चे अधिक घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान, अचानक शॉर्ट सर्किट ने लागलेल्या आगीने राहुल पांडुरंग लोणारे यांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत असून पुढील मात्र, अनर्थ टळला असेही बोलल्या जात आहे.

कोणी रेती देता का रेती; रेतीच्या तुटवड्यामुळे गवंडी कामगारांवर आली उपासमारीची वेळ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासून घरकुल सह इतर बांधकामांना रेती मिळत नसल्याने यावर निर्भर असलेल्या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. तर तालुक्यातील रेतीडेपो शोभेची वस्तू ठरू पाहत आहे.

शासनाने नवीन वाळू धोरण आणले. या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी केव्हाचीच झाली. या नवीन धोरणानुसार सर्व नागरिकांना प्रति ब्रास वाळू मिळणार अशा घोषणाही झाल्या आहे. त्यानंतर वाळू मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी महाखनिज या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद केल्या आहे. परंतु  घरकुल बांधकामांना रेती मिळत नसल्याच्या अनेक लाभार्थ्यांची ओरड कायम आहे. त्यामुळे अनेकांच्या घराची अर्धवट कामे आहेत, तर तर काहींच्या घराची छपाई व्हायचे आहे. तूर्तास हे सर्व अर्धवट असलेले बांधकामं कामगारांना वाकुल्या दाखवत आहे.

तालुक्यातील शेवट च्या टोकावर असलेल्या कोसारा घाटावर शासकीय डेपो थाटला आहे. मात्र, अजूनही या रेती डेपोतून तीळमात्र रेती लाभार्थ्यांना मिळाली नाही असे नागरिकांतून बोलल्या जात आहे. रेतीसाठी घरकुल लाभार्थी वणवण फिरत आहे. हा प्रश्न गंभीर असताना लोकप्रतिनिधी प्रशासन चीरनिद्रेत का आहे. असा प्रश्न उपस्थिती होत आहे. नको तिथे डोकं लावत लोकप्रतिनिधी तासंतास ठिय्या मांडून बसतात परंतु जनतेच्या समस्या, प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही असे जनतेतून बोलल्या जात आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून लाभार्थ्यांना वाळू मिळाली नाही यासाठी कधी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याचे दबक्या आवाजात नागरिकात चर्चील्या जात आहे.वरून ते खालपर्यंत सरकार आपलं, सारी सिस्टीम लोकप्रतिनिधीची असे ठासून सांगत असताना रेतीचे भिजत घोगंडं अडलं कुठे हे कळायला मार्ग नाही. परंतु या दुर्लक्षितपणामुळे संबंधित व्यवसाय गेल्या तीन वर्षांपासून डबघाईस आले आहे. रेती महत्वाचे असल्यामुळे सिमेंट, सलाख, गिट्टी काही कामाची नाही. महत्वाचे आहे ती,म्हणजे रेती. रेतीच मिळत नसल्याने अनेक काम निकृष्ट दर्जाचे होत असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

आता मोदी योजना आली. इतर मागासवर्गीयकरिता नवीन घरकुल उद्दिष्ट आहे, सर्व प्रशासन यंत्रणा जुळवा जुळव साठी कामाला लागली. परंतु रेती मिळत नसल्याने घरकुल बांधकाम करतील कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आधीचे घरकुल अर्धवट असल्याने सरकार ने कोणतीही योजना आखाच्या अगोदर रेती उपलब्ध करून द्यावी, मग योजना बिजना राबविण्यात यावी असा खोचक सवाल ही नागरिकांतून करण्यात येत आहे. समोर दिवाळी सारखा सण आहे. तालुक्यातील रेती अभावी संबंधित कामगार मजूर कित्येक दिवसापासून रिकामे आहे, त्यांच्या हाताला काम नाही. परिणामी त्यांच्या वर उपासमारीची वेळ असून घरकुल लाभार्थी रेती साठी क्षणोक्षणी तडफडत आहे. अशी सद्य स्थिती असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळवून द्यावी जेणेकरून कामगारांवर उपासमारीची वेळ येणार नाही, त्यामुळे रेती ची किचकट असलेली बाब सध्या बाजूला सारून सरळ सरळ रेती लाभार्थ्यांना मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

ठाण्यात आमदार बोदकुरवार यांचे पाच तास ठिय्या आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील प्रभाग क्रमांक 16 मधील दुर्गादेवीचे विसर्जन सुरु असताना आणखी वेळेसाठी 20 मिनिटे वाजवू द्या,मात्र वेळ मागल्यानंतर मारेगाव येथील भाजपाचे नगरसेवक राहुल राठोड यांना ठाण्यात बोलाविले आणि कॅबिनमध्ये ठाणेदारांनी मारहाण केली. हा घडलेला प्रकार पिडीत नगरसेवक यांनी आमदार यांना कळविला. का? आणि कशासाठी? हा प्रश्न करित आमदार व पदाधिकारी कार्यकर्ते यासह काल ठाण्यात पाच तास ठिय्या मांडून ठाणेदार जनार्दन खंडेवार यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी करण्यात आली.

शहरातील प्र. क्र.16 मधील सार्वजनिक दुर्गादेवी विसर्जन शुक्रवारी करण्यात आले. यात अनेक युवक नाचत असतांना पोलीस प्रशासनाचा आदेशानुसार विहीत वेळ संपल्याचे आदेश तोंडी स्वरूपात देण्यात आले. मात्र, मंडळांनी विनंतीवजा करीत 20 मिनिटांचा अधिकचा वेळ मागितला. विहीत वेळ संपताच ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले. परंतु ठाणेदार यांनी नगरसेवक राठोड यांना स्टेशनला बोलावून घेत कॅबिनमध्ये अकारण शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याचा राठोड यांचा आरोप आहे. यात राठोड यांच्या पाठीला मारण्याचे व्रण असल्याने ठाणेदाराप्रती सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा संताप थेट ठाण्यात पोहचला आणि तब्बल पाच तास ठिय्या मांडण्यात आला.

दरम्यान, काल शनिवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेसह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येत रोष व्यक्त करित उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांचेकडे ठाणेदार उचलबांगडीची मागणी लावून धरली. ही मागणी पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड यांचेशी भ्रमणध्वनी वर सांगितली. मात्र, त्यांनी पारदर्शक चौकशी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन दिले. परिणामी यावर समाधानकारक निर्णय न झाल्याने आमदार बोदकुरवार यांनी एसपी सोबत चर्चा करून उचलबांगडीची मागणी रेटून धरली अन्यथा, ठाणेदार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा गर्भित ईशारा देण्यात आला. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या माध्यमातून उचलबांगडीची दिशा ठरणार आहे. ठाणेदार हे यवतमाळ मिटिंग ला गेल्याने त्यांचा मुक्काम चार दिवस जिल्हास्थळी राहणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, जिल्हा संघटक नितीन भुतडा, मारेगाव भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे, पदाधिकारी अविनाश लांबट, प्रशांत नांदे, पिडीत नगरसेवक राहुल राठोड, वैभव पवार, शशिकांत आंबटकर, सुधाकर बोबडे, युवा शहराध्यक्ष अनुप महाकुलकार, विनित जयस्वाल, मारोती पाचभाई, पांडुरंग उंबरकर, बोटोणी सरपंच सुनीता जुमनाके, राजेश पांडे, गणेश झाडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आमदार बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. 
हे प्रकरण आता तापण्याचे संकेत आहे. पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ताठर भूमिकेने प्रकरण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता तिसरा डोळाच उचलबांगडी साठी दगडाचा मैल ठरणार आहे. 

धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना अत्यंत गंभीर आणि धोकादायक - ज्ञानेश महाराव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : धर्माच्या आधारे निर्माण झालेले पाकीस्तान, बांग्लादेश आणि ईतर देशांची परिस्थिती बघीतली तर धर्माधिष्ठीत राष्ट्राची कल्पना किती अव्यवहार्य, तकलादू आणि फसवी आहे याची कल्पना येते. त्यामुळे हिंदूराष्ट्र -हिंदुराष्ट्र अशी संकल्पना आणि घोषणा करणाऱ्या तथाकथित लोकांच्या बुद्धीची किव करावी,तेवढी कमी आहे. सोबतच अशा कल्पनेतील फोलपणा आणि गांभीर्य लक्षात घ्यावे.धर्म कोणताही असो. धर्माधिष्ठीत राष्ट्र संकल्पना ही अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे,असा ईशारा प्रख्यात पत्रकार, संपादक आणि रंगकर्मी ज्ञानेश महाराव यांनी दिला.
       
शिव महोत्सव समिती वणी चे वतीने दि.२७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या बळीराजा व्याख्यानमालेत "फक्त राष्ट्रभक्तांसाठी" या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणुन संबोधित करत होते.स्मृतीशेष सांबशिव नारायणराव देवडे यांच्या स्मृतीस समर्पित हे व्याख्यान बाजोरिया लॉन,वणी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी विराजमान होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर,शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोक सोनटक्के, एलआयसी चे अजय गेडाम, निलीमाताई काळे, शिरपुर च्या पोलीस पाटील सुवर्णा बोंडे उपस्थित होत्या.
    
" फक्त राष्ट्रभक्तांसाठी" या विषयाची गुंफण करतांना ज्ञानेश महाराव यांनी ईसराईल या देशाचे उदाहरण दिले.राष्ट्र हे फक्त भौगोलीक सिमांनी बनत नाही तर राष्ट्र हे मनात आणि विचारात असावे लागते. त्यामुळे सद्या देशात जी लोक राष्ट्रभक्तीच्या नांवाने गळे काढत आहे त्यांच्यापासुन सावध राहावे. देशांत,समाजात जे जे अनिष्ट आहे,विकृत आहे त्या विरुद्व आपण व्यक्त झाले पाहीजे.ते ईतरांनाही सांगीतले पाहीजे. तरच आपण काही ऊज्वल भविष्याचे स्वप्न पाहु शकु.पुराणकाळातील कल्पोकल्पित आणि भाकडकथांवर देशाची उभारणी होऊ शकत नाही. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या काळात आरबीआय बँकेची वापरलेली राखीव गंगाजळी, काही उद्योगपतींचे माफ केलेले अब्जोवधींचे कर्ज,अमर्याद झालेल्या जंगलतोडीमुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान यांवर महाराव यांनी मार्मिक भाष्य केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी व्याख्यानमालेचा उद्देश कथन करून व्याख्यानमालेचे हितचिंतक, आश्रयदाते आणि श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
      
व्याख्यानमालेच्या प्रारंभी बळीराजा च्या प्रतिमेला माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले.जयंत कुचनकार,अमोल बावने,दिगांबर ठाकरे आणि सोनाली थेटे यांच्या सामुहिक जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समितीचे वतीने संजय गोडे यांनी,प्रास्ताविक भुमिका गणेश बुटे यांनी तर आभार अजय धोबे यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत समितीचे निमंत्रक कृष्णदेव विधाते,राजेंद्र देवडे,एडव्होकेट चंद्रकांत बोंडे, डॉ.श्रीकांत भगत, एडव्होकेट अरविंद सिडाम,वाल्मीक बनकर, अंकुश उपरे यांनी पुस्तक व स्मृतीचिन्ह प्रदान करून केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिव महोत्सव समितीच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.
        
     

उद्या पांढरकवडा येथे धिक्कार मोर्चा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : शासनाच्या चुकीच्या व पिळवणुकीच्या धोरणाविरोधात शासकीय, निमशासकीय कर्मचारी, बेरोजगार, शेतकरी व पेन्शनर्स असोसिएशन कृती समितीच्या वतीने 29 ऑक्टोबर रोजी धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य सरकारने गत काही वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा संघटित, असंघटित क्षेत्रातील सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रांतील कर्मचारी, बेरोजगार, पेन्शनर्स, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम झाला आहे. समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड असंतोषही निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा जास्त संघटनांनी एकत्रित येऊन टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा 29 ऑक्टोबर रोजी मोर्चाच्या माध्यमातून करण्याचे ठरविले आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

याबाबत शासनाने दखल न घेतल्यास यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला असल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक सेवानिवृत्त तहसीलदार गणेश राऊत, मुख्य संयोजक कैलास खार्डे यांनी दिली. हा मोर्चा सकाळी 10 वाजता तालुका क्रीडा संकुल येथून निघणार आहे. शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह देशभरातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने त्यांनी स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दीन दलित, दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरु करून करोडो मात- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही योजना राबवित असून १ एप्रिल २०२३ नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित'सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट्य असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाईन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

अंगणवाडीसेविकेंच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार- श्रीमती स्मृती इराणी

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबवणार- मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना संस्थात्मक प्रसुती होताना अडचणी येवू नयेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना सुरू केली आहे. याद्वारे 17 आदिवासी जिल्हे मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्व शासनाच्या योजना एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या बालकापर्यंत महिला व बाल विकास पोहोचत असून अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या माध्यमातून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

विद्यार्थी आटो पलटी होऊन भीषण अपघात..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डीहून मारेगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव विद्यार्थी वाहून नेणाऱ्या आटो ला नियंत्रण सुटून पलटी झालेल्या अपघातात एका शाळेकरी विद्यार्थ्याचा उपचाराअंती मृत्यू तर तीन विद्यार्थी किरकोळ झाल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी 7 वाजताचे दरम्यान घडली.
मारेगाव तालुक्यातील केगांव येथील आटो चालक अनंता विठोबा देठे हा नेहमीप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन हा केगांव मार्डी मार्गे मारेगाव येत असतो. आजही जवळपास 10 ते 12 विद्यार्थी घेऊन मारेगाव कडे जात असतांना पिसगांव जवळील पंढरकवडा वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहणाला आटो भिडणार म्हणून आटो चालकांनी ब्रेक केला आणि नियंत्रण सुटून आटो पलटी झाला. यात अनिकेत श्रावण पिंपळशेडे (17) हा आटोत दबून दहा ते बारा फूट घासत गेला व जागीच मृत्यू झाला. तो राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे दहाव्या वर्गात शिकत होता, तर इतर तीन विद्यार्थी किरकोळरीत्या जखमी झाले. सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान,घटनेची माहिती कळताच पिसगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या दुर्देवी घटनेने केगांव सह तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ग्रामीण भागात बसफेऱ्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जिव मुठीत घेऊन शाळेत जावं लागत आहे. संबंधित विभागाने सतत होणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन गावोगावी बस फेऱ्या सुरु कराव्यात, अन्यथा काँग्रेस कमिटी च्या वतीने वणी आगाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

 -मारोती गौरकार
तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मारेगाव 

मारेगावात धूम स्टाईल रेसिंग करणाऱ्यांचा उच्छाद आवरा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : शहरात सध्या भरधाव रेसिंग फॅडने मारेगावकरांची झोप उडवली आहे. शहरातील रस्ते मोकळे असो की, गजबजलेले असो. स्टंटबाजी करत भरधाव रेसिंग करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे हे वेळीच थांबवा अशी मागणी केली जात आहे.
मारेगावात दिवसेंदिवस रेसर बाईक ची संख्या वाढत चालली असुन, सदर रेसर बाईक चालकाकडे कोणत्याही प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स नसुन विनाकारण सुसाट बाईक चालवुन हौदोस निर्माण करीत आहे. परिणामी भरधाव बाईक चालवतांना समोर कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भात काही रेसर बाईक चालकांना संघटनेकडुन जॉब विचारणा केली असता, त्यांना कोणत्याही प्रकारची उत्तरे मिळाली नाही. उलट निमूटपणे बाईक धारक 'धूम' ढोकत निघून जातात. हे सर्व प्रकार मारेगांव शहरात ट्राफीक पोलीस नसल्याकारणाने या रेसर बाईक धूम ढोकणाऱ्याना कसल्याही प्रकारची भिती नसल्याची निवेदनात नमूद आहे. 
ज्यामुळे मारेगावकरांना त्रास होतोच आहे. मात्र, या स्टंटबाज आणि भरदिवसा रेसिंगने पादचारी यांच्याही नाकात दम केला. अनेक वेळा याबाबत माध्यमातून वृत्त प्रकाशित करून देखील हे स्टंटबाज आणि भरधाव रेसिंग सुरूच आहेत. आता त्यांच्या मुळावरच घाल घाला व त्यांचा हैदोस आवरा यासाठी जय जगन्नाथ चालक मालक संघटनेच्या वतीने पोलिसात एक निवेदन देऊन मागणी केली आहे. 
निवेदन देताना सचिन देवाळकर, साजीद शेख, किशोर तूरणकर, बन्सी पाटील, बबन पाटील, दत्ता डावरे, प्रफुल उरकुडे, पंकज एम्बडवार, प्रल्हाद कनाके, पवन नक्षणे आदींची उपस्थिती होती. 

वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिव महोत्सव समिती वणी द्वारा "बळीराजा" व्याख्यानमालेचे दिनांक 27 व 28 ऑक्टोबर रोज शुक्रवार व शनिवारला सायंकाळी 6: 30 वा. बाजोरिया लॉन,वरोरा रोड, वणी येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिवमहोत्सव समिती वणीच्या वतीने दरवर्षी दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेचे हे नववे वर्ष आहे. यावर्षी वक्ते म्हणून मुंबई येथील प्रख्यात व्याख्याते, पत्रकार- संपादक,नाट्यनिर्माते,नट -गायक आणि विचारवंत अशी विविधांगी ओळख लाभलेले तथा मराठीतील सर्वाधिक खपाच्या साप्ताहिक "चित्रलेखा"चे संपादक मा. ज्ञानेश महाराव उपस्थित राहणार आहे.
शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी स्मृतीशेष सांबशिव नारायणराव देवडे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ "फक्त राष्ट्रभक्तांसाठी" हा व्याख्यानाचा विषय असून शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी स्मृतीशेष रामचंद्र जागोजी सपाट यांचे स्मृतीप्रित्यर्थ "शाहिरांची लोकशाही"हा व्याख्यानाचा विषय आहे.
   
या व्याख्यान मालेत यापूर्वी मा. गंगाधर बनबरे, कॉम्रेड स्मिता पानसरे, मा. विजय जावंधिया, डॉ.मंजुश्री जयसिंगराव पवार, मा.उत्तम कांबळे, मा. चंद्रकांत वानखेडे, मा.साहेब खंदारे, डॉ. प्रल्हाद लुलेकर इत्यादी नामवंत वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत.
     
वणी शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब व इष्टमित्रांसह उपस्थित राहून व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा, असेआवाहन शिव महोत्सव समिती,वणीच्या वतीने करण्यात येत आहे.

या धान्याच्या भाकरी आहे मधुमेहावर रामबाण उपाय! रोज बदलून खा, वाढणार नाही शुगर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

डायबेटीस झाल्यास रक्तातील साखरेचे म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. याचे कारण म्हणजे स्वादुपिंडाद्वारे तयार होणाऱ्या इन्सुलिन हार्मोनचे कमी उत्पादन. इन्सुलिन ग्लुकोज शोषून घेते आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. परंतु इन्सुलिनच्या अभावी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू लागते. हा ग्लुकोज रक्तात तरंगत राहतो आणि रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचू लागतो.

गव्हाच्या पिठात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. म्हणजेच ते साखरेचे प्रमाण वाढवते. त्यामुळे या पिठाला पर्याय म्हणून अशा पिठाच्या भाकरी खाव्यात, ज्यामुळे साखर वाढत नाही आणि कमी होते.
नाचणीच्या पिठाची भाकरी :
नाचणी (फिंगर बाजरी) आजकाल पोषक तत्वांच्या बाबतीत सोन्याची झाली आहे. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, नाचणी हे फायबरने भरलेले धान्य आहे. त्याच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी रक्तातील ग्लुकोजची पातळी कधीही वाढू देत नाहीत. ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आठवड्यातून दोन-तीन दिवस नाचणीच्या रोट्या खाल्ल्या तर त्यांनाही मधुमेह होत नाही. नाचणीमध्ये असलेल्या फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजनही कमी होते. नाचणीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करतात.
राजगिरा भाकरी :
राजगिरा ही नाचणीसारखी बाजरी आहे. राजगिरा एक तृणधान्य वनस्पती आहे, ज्यामध्ये लाल रंगाचे धान्य असतात. लापशी राजगिरा पासून बनवली जाते. अलीकडील संशोधनात असे आढळून आले आहे की, राजगिरामध्ये मधुमेहविरोधी आणि अँटीऑक्सीडेटिव्ह गुणधर्म आहेत. म्हणजेच ते साखर वाढू देत नाही आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. आजकाल राजगिरा खूप लोकप्रिय झाला आहे. राजगिरा भाकरी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

बार्ली रोटिस :
जव हे भरड धान्यांच्या श्रेणीत येते. बार्ली हे धान्य आहे, जे फायबरच्या मुबलक प्रमाणासाठी ओळखले जाते. यासोबतच यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे ते चयापचय वाढवणाऱ्या हार्मोन्सचे प्रकाशन वाढवते. अशा प्रकारे ते इन्सुलिन वाढवण्यास मदत करते. बार्ली कमी दर्जाची जळजळ देखील कमी करते, ज्यामुळे शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण मिळते.


साधक बाधक चर्चानंतर अखेर काँग्रेसचे "आमरण उपोषण" मागे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : शहरातील पोलीस वेलफेयर असोसिएशनचे भारत पेट्रोलियम समोर MSEB विभागाकडून तालुक्यात सुरु असलेली अघोषित लोडशेडींग व शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीज पुरवठा देण्यात यावा, यासह इतर मागण्या घेऊन मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने दि.23 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु केले. 

माजी सभापती नरेंद्र पा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, युवक ता. अध्यक्ष आकाश बदकी व काँग्रेस समर्थक अंकुश माफूर यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकरी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. दसऱ्या आपल्या साठी अतिशय महत्वाचा सण. या महत्वाच्या सणाला बाजूला ठेऊन जनतेच्या हितासाठी वीज वितरण कंपनी च्या मनमानी कारभार विरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते. अनेक राजकीय, सामाजिक तथा गावागावात पुढारी,नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते महिला संघटना, पुरुष मंडळींनी उपोषण मंडपी भेट देऊन आपली समस्या मांडून या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. हे आमरण उपोषण काँग्रेसचे जरी असले तरी ते शेतकरी व जनतेच्या हितासाठी आणि शासन प्रशासनाला जागे करण्यासाठीचा हा एकमेव उद्देश होता आणि म्हणून या आमरण उपोषणाला अखेर सर्वांच्या सहकार्याने घवघवीत यश आले. असे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले. अधिकाधिक मागण्या जवळपास महावितरण अधिकाऱ्यांनी मान्य करण्याचे आश्वासन नरेन्द्र कटारे कार्यकारी अभियंता, पाटील साहेब उपअभियंता, खंगार मुख्य अभियंता यांनी दिले. 

महावितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना तीन दिवसाचा अल्टीमेटम दिल्यानंतर सोमवार (ता.23) पासून बसलेल्या आमरण उपोषणास आज बुधवार ला सायंकाळी 6.15 वाजता उपोषणकर्ते ता. अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरी शंकर खुराणा, नगरसेवक आकाश बदकी, अंकुश माफूर यांना जूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र पा ठाकरे, वसंत जिंनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, यांनी आमरण उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करून मारेगाव तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे या उपोषणास दिलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद व आभार मानले. त्यामुळे या उपोषणाचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठया प्रमाणात फायदा निश्चित होणार आहे असे एकंदरीत चित्र दिसून आले.

यावेळी जयकुमार आबड, घनश्याम पावडे, डॉ महेंद्र लोढा, कुंभा सरपंच अरविंद ठाकरे, यु. कॉ.शहराध्यक्ष समीर सय्यद, महिला ता.अध्यक्ष मायाताई गाडगे, सरपंच तुळशीराम कुमरे, सरपंच रविराज चंदनखेडे, प्रफुल विखणकर, सरपंच रामचंद्र जवादे, ट्रायबल सेल अध्यक्ष समिर कुळमेथे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष आकाश भेले, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शाहरुख शेख, जनहित कल्याण उपाध्यक्ष रॉयल सय्यद, आदी सह सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर वर्गाचा अलोट जनसमुदाय उपोषण मंडपी पाहायला मिळाला.

उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे 

1) लोड शेडींग पूर्णतः बंद करण्यात यावी. 2) शेतकऱ्यांच्या सिंचना करिता 24 तास विज उपलब्ध करून देण्यात यावी. 3) मारेगाव तालुक्यात 132 के. वि. चे नवीन उपकेंद्र लवकर तय्यार करण्यात यावे. 4) ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन विद्युत केंद्राची मान्यता देण्यात यावी. 5) 33 के. वि. चे नवीन वनोजा (देवी), कुभां, वेगाव, रोहपट येथे उपकेंद्र करण्यात यावे. 6) मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीची विद्युत तयार करण्यात यावे. 7) शेतकऱ्यांचे विज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे. 8) बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी. 9) ग्रामीण भागातील गांवठाण वरील विद्युत तारा व पोल देखभालचे काम त्वरित सुरु करण्यात यावे. 10) शेतकऱ्यांचे नवीन A. G. चे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावी.

वीज वितरण कंपनी कडून दिलेले आश्वासन 

एकुण दहा मागण्यांसाठी तीन दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. आज त्या दहाही मागण्या मान्य झाल्या आहेत. काँग्रेस चे मोठे यश मानले जात आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचे निश्चित बोलल्या जात असताना 24 तास विज पुरवठा करण्यात यावा ही प्रमुख मागणी होती. त्यामध्ये 6 तास विज पुरवठा देण्यात येईल त्यात 5 तास दिवसा आणि 3 तास सायंकाळी अशी 8 तास साठी विजपुरवठा करण्यात येणार.
132 केव्ही चा प्रस्ताव वरीष्ठाकडे मंजुरी साठी पाठविण्यात येणार. मुद्दा क्रमांक चार नविन विद्युत केंद्रास मान्यता देण्यात येईल. व, दोन सोलर प्लॅन मंजूर. याप्रमाणे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

विजेचा लपंडाव व लोडशेडींग विरोधात आमरण उपोषण सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात वारंवार विजेचा लपंडाव आणि अघोषित लोडींग, यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगलाच फटका बसत आहे. शेतातील उभे पिक सुकत आहे. विजेवरील छोटे-मोठे उद्योगही सणासुदीच्या पर्वावर मोकळीस पडतांना दिसत आहे. परिणामी शेतकरी, लघु उद्योगदार आर्थिक अडचणींचा सामना करित असताना याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी ला निवेदन सादर करून विजेचा पुरवठा 24 तास, लोड शेडींग बंद करण्याची मागणी केली होती, यासह इतरही मागण्या होत्या. परंतु जगाच्या पोशिंद्यच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने अखेर काँग्रेस कमिटीच्या वतीने 23 ऑक्टोबर पासून स्थानिक महावितरण कंपनी च्या विरोधात मार्डी चौकातील पेट्रोल पंपासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र, संबंधित विभागाने तीळमात्र दखल घेतली नसल्याने उपोषण आणखी लांबले असताना काल रात्री त्यातील उपोषणकर्ते तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांची प्रकृती खालावली, त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे माहिती आहे. त्याच बरोबर कृ. उ. बा. समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा यांची सुद्धा प्रकृती खालावण्याचे संकेत आहे. परिणामी हे आमरण उपोषण आणखी न लांबता ताबडतोब संबंधित विभागाने दखल घेऊन मागण्या मंजूर कराव्या,असे मत जण सामान्यांतून उमटत आहे.
दरम्यान, तीन दिवसापासून सुरु असलेल्या आमरण उपोषणास अनेक राजकीय सामाजिक तथा सामान्य नागरिक या उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवीत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कुंभकर्णी महावितरण कंपनी ला जागे करण्यासाठी आज तिसऱ्या दिवशी सुद्धा आमरण उपोषण सुरु असताना असंख्य शेतकरी शेतमजूर ओघ उपोषण मंडपी भेट देऊन आपला रोष महावितरण विरोधात व्यक्त करत जाहीर पाठिंबा दर्शवित आहे. 

....तर मागण्या मंजूर होई पर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार : तालुका काँग्रेस कमिटी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगावतालुका काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीने काल दि.23 ऑक्टोबर 2023 पासून मार्डी चौकातील पेट्रोल पंपच्या समोर महावितरण कंपनी च्या विरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास उपविभागातील विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी समर्थन देत आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

 दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने उपोषण कर्त्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यातील लोकांचे जीवन हे 100 टक्के शेतीवर आधारित असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. अशावेळी शेती साठी वीज पुरवठा हा महत्वाचे असताना फक्त आठ तास वीज पुरवठा दिल्या जाते, त्यामध्ये संपूर्ण दिवसात 20 ते 25 वेळा दर पाच मिनिटाला वीज खंडीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा मोठा प्रश्न उभा ठाकला असताना महावितरण कंपनीने 24 तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा करावा, लोड शेडींग पूर्णतः बंद करावी यासह इतर ही मागण्या आहे. त्या तत्काळ मंजूर करावे अशी आमची मागणी आहे. जर उपविभागीय कार्यालय, मारेगाव यांनी मागणीची दखल घेतली नाहीत तर हे आमरण उपोषण जनतेला न्याय मिळेपर्यंत मागण्या मंजूर होई पर्यंत सुरु राहणार आहे. असे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात आणि प्रत्येक गावात शेतकरी शेतमजूर व्यावसायिक वर्गाने महावितरण कंपनीला जागे करण्यासाठी एकत्र यावे. व आमरण उपोषणास भेट द्यावी, आपल्या समस्या मांडव्या, असे सभापती गौरी शंकर खुराणा म्हणाले. 

पुढे बोलतांना यु कॉ. चे ता अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी म्हणाले, एच ओ डी योजने मार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना एजी कनेक्शन ला प्रत्येकी 1 डिपी देण्यात आली. परंतु त्या डिपी बोगस असून वर्ष भरा पासून 5 ते 6 वेळा डिपी बंद पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्या पावसात डिपी बदलविण्याकरिता संबंधित कार्यालयाला हेलपाट्या माराव्या लागतात. त्यात आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो.

तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत पिकांसाठी पाण्याची सध्या अत्यंत गरज आहे. त्यासाठी शेतीला पाणी देण्यासाठी विज अखंडित असणे आवश्यक आहे. परंतु नेमकी शेतकऱ्यांना विजेची गरज भासते त्याच वेळी महावितरण कार्यालयाकडून सतत वीज खंडीत केल्या जाते. त्यामुळे हा सर्व प्रकार एमएसईबि (MSEB) ने ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांना 24 तास अखंडीत वीज पुरवठा द्यावा,असं अंकुश माफूर त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक महावितरण कार्यालयाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर या अघोषित लोड शेडींग बंद करावी. त्याच बरोबर मारेगाव तालुक्यात 132 के. वि. चे नवीन उपकेंद्र लवकर तयार करण्यात यावे, ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन विद्युत केंद्राची मान्यता देण्यात यावी, 33 के.वि. चे नवीन वनोजा (देवी), कुंभा, वेगाव, रोहपट येथे उपकेंद्र करण्यात यावे, मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीत जास्त विद्युत तयार करण्यात यावे, शेतकऱ्यांचे विज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे, बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी, ग्रामीण भागातील गांवठाण वरील विद्युत तारा व पोल देखभालचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नवीन A.G. चे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावी. या प्रमुख मागण्या घेऊन आमरण उपोषण सुरु आहे. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. नवरात्री व विजयादशमी सारखा सण असून सुद्धा सणवार न पाहता जनतेच्या न्यायासाठी  महावितरण कंपनीच्या तकलाधू धोरणाच्या विरोधात मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे कालपासून उपोषण सुरु आहेत.

उपविभागीय कार्यालयाला 3 दिवस देऊन सन्मान केला. आता 23 तारखेनंतर महावितरण कंपनी वर परिणाम होईल, असा इशारा गौरकार यांनी दिला आहे.


धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त सर्वाना मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!


मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला

भीमाने कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन

सर्वाना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा !

शुभेच्छुक :- आयु. राजू दारुंडे
संचालक : चोखाजी एच पी गॅस एजन्सी, धामणी रोड मारेगाव 

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा..



काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य
परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य
दिक्षाभूमीत्या पायथ्याशी जगण्याचे हे धैर्य
चला एकमुखाने गाऊ भिमाचे शौर्य
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा!

 शुभेच्छुक :-
संजय रामचंद्र खाडे
अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड, वणी
अध्यक्ष रंगनाथ स्वामी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वणी
संचालक : वसंत जिनिंग, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी

संगीता संजय खाडे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या. वणी
अध्यक्ष: सहयोगी महिला बहुउद्देशीय संस्था, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी

तमाम जनतेला हा दसरा आनंदाचा, भरभराटीचा,आणि आरोग्यदायी मंगलमय जावो, हार्दिक शुभेच्छा...!


आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....

शुभेच्छुक :-
संजय रामचंद्र खाडे
अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड, वणी
अध्यक्ष रंगनाथ स्वामी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वणी
संचालक : वसंत जिनिंग, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी

संगीता संजय खाडे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या. वणी
अध्यक्ष: सहयोगी महिला बहुउद्देशीय संस्था, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी

आजपासून मारेगावात काँग्रेसचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश बदकी व ग्रामपंचायत सदस्य अंकुश माफूर हे आज सकाळी 12.30 वाजेपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

जगाच्या पोशिंद्याला 24 तास वीज पुरवठा मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर या अघोषित लोड शेडींग मधून मुक्तता मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी, त्याच बरोबर मारेगाव तालुक्यात 132 के. वि. चे नवीन उपकेंद्र लवकर तयार करण्यात यावे, ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन विद्युत केंद्राची मान्यता देण्यात यावी, 33 के.वि. चे नवीन वनोजा (देवी), कुंभा, वेगाव, रोहपट येथे उपकेंद्र करण्यात यावे, मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीत जास्त विद्युत तयार करण्यात यावे, शेतकऱ्यांचे विज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे, बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी, ग्रामीण भागातील गांवठाण वरील विद्युत तारा व पोल देखभालचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नवीन A.G. चे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावी. या शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी मारेगाव तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
मारेगाव तालुक्यातील MSEB उपविभागाकडून होत असलेली विजेची 'लोड शेडींग' बंद करून शेतकरी व तालुक्यातील जनतेला न्याय मिळण्यासाठी वरील मागण्या मंजूर होय पर्यंत मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. तीन दिवसाचा अल्टीमेटम दिल्या नंतर ही तीच स्थिती असल्यामुळे आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर या त्रासापासून मुक्ती मिळावी आणि बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी. यासह अन्य मागणीसाठी ऐन दसऱ्याच्या एक दिवसा अगोदर पासून मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरी शंकर खुराणा, यु. कॉ ता. अध्यक्ष आकाश बदकी व ग्राम. सदस्य अंकुश माफूर (सोमवार) आजपासून पोलीस वेलफेअर भारत पेट्रोलियमच्या समोर,मार्डी चौक येथे आज सकाळी 12.30 वाजेपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

जबरण वसुली करून मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना वणी पोलिसांनी केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील दोन तरुणांनी एका युवकाला काही कारण नसताना शहरातील मुख्य चौकातून दुचाकीवर बसवून शाळेच्या मागे अंधाराच्या ठिकाणी नेऊन मारहाण व खंडणी वसूल केल्याची घटना घडल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच दोन आरोपीना अटक करण्यात आली.

आरोपी युवी मोगरे (24), व साहिल मोगरे (25) रा.सेवानगर (वणी) व इतर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. काल दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी वणी पोलिसांनी जबरण वसुली करून मारहाण करत धमकी देणाऱ्या दोन तरुणांना वणी पोलिसांनी अटक केली. 

सविस्तर वृत्त असे की, शहरातील प्रगती नगर येथील सुषमा वाघमारे ह्यांच्या तक्रारी नुसार तक्रार कर्त्यांच्या मुलाकडे आरोपी यांचे कोणत्याही प्रकारचे पैसे नसून आरोपी यांनी मुलाकडे पैशाची मागणी केली. "मुलाचे खांद्यावर हात ठेवून, कॉलर पकडून आमचे सोबत चल नाहीतर किडनॅप करतो," असे म्हणत गुंडगिरी करत जबरदस्तीने गाडीवर बसवून एका शाळेच्या मागे अंधारात नेवून हात बुक्यानी मारहाण केली. आणि तत्काळ 3000 हजार रुपये मागितले. व दुसऱ्या दिवशी 7000 हजार रुपये घेऊन ये नाहीतर तुला चाकूने मारहाण करतो, अशी धमकी देत अश्लिल भाषेत शिविगाळ केली.

तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवी मोगरे,व साहिल मोगरे, रा.सेवानगर (वणी) यांच्या सह इतर विरोधात कलम 143,147,149,294,386, भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली.

पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई डि.बि.पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे, यांनी केली. अधिक तपास सपोनि दत्ता पेंडकर हे करीत आहे.

सावर्ला जवळ आढळून आला मृतदेह, पोलिसांनी ओळख पाठविण्यासाठी केले आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीत 21 ऑक्टोंबर रोजी रात्री 6 वाजेच्या दरम्यान वणी-वरोरा महामार्गावरील सावर्ला पुल नजीक एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. हा अपघात की घातपात याबाबत अजून तरी माहिती समोर आली नसून पोलीस अधिक तपास करत आहे. 

दरम्यान, वणी पोलिस स्टेशनचे जमादार गजानन होडगीर हे घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणी करिता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून उंची 5 फुट आहे. मृतकाच्या अंगात काळा फिकट रंगाचा पॅन्ट घातलेला आहे. तर उजव्या हातात राखीचा धागा बांधलेला आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी वणी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.


बारमध्ये बसून चियर्स करणे महागणार..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मद्य प्रेमींसाठी वाईट बातमी असून परमिट रूममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावर अतिरिक्त पाच टक्के 'व्हॅट' वाढवून राज्य सरकारने मद्यपींना चांगलाच झटका दिला. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्य पिणाऱ्या शौकिनांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर, मात्र याचा कोणताही परिणाम होणार नाही.

महाराष्ट्र सरकार नवीन उत्पादन शुल्क धोरण आणण्याच्या विचारात आहे. महसूल वाढीसाठी सरकारने बीयरचे दर कमी करण्यासंदर्भात समिती गठीत केली आहे. दुसरीकडे मद्याच्या दरात अतिरिक्त पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 % परमिट रूममध्ये मद्य सेवांसाठी व्हॅट दर सध्या पाच टक्के आहे. तो आता दहा टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. त्यामुळे बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्य शौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

वित्त विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून बार, क्लब आणि कॅफेमध्ये दिल्या जाणाऱ्या मद्याच्या किमतीत वाढ होणार आहे. सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर बारचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

२५ ऑक्टोबर ला "वखार आपल्या दारी" अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वणी येथे

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थ सहाय्यीत स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या "वखार आपल्या दारी" अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा वणी येथील स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वणी वखार केंद्र, (चंद्रपूर रोड) येथे आयोजन करण्यात आल्याचे रंगनाथ स्वामी फार्म प्रोडूस कंपनी लि. वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी माहिती दिली.

सदर कार्यशाळा विनामूल्य असून या कार्यशाळेला सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, महिला बचत गटांचे फेडरेशन, सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांना गोदाम उभारणी, गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान, गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम पावती विषयक योजना याबाबतच्या मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला १०० शेतकरी संख्येपर्यंत मर्यादित असल्याचे असेही सांगण्यात येत आहे.
 
या कार्यक्रमाची वेळ सकाळी १० वाजता पासून दुपारी ३ पर्यंत असणार आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहून शेतकरी वर्गाने चालू खरीप हंगामात आपले उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने वखार मंडळाच्या गोदामात शेतमाल साठवून बाजार भाव वाढल्यावर शेतमाल विकावा. दरम्यान, गोदामात शेतमाल साठविल्यावर गोदाम भाड्यात ५० टक्के सूट व ९ टक्के दराने तत्काळ कर्ज सुविधा उपलब्ध आहे. यासाठी वखार महामंडळ आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल. याकरिता प्रक्रिया समजून घेण्याच्या अनुषंगाने दिनांक २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने इतर विभागाच्या योजनेबद्दल सुद्धा मार्गदर्शन होणार असल्याने या कार्यशाळेचा शेतकरी वर्गाने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे नागपूर विभागाचे प्रमुख श्री. अजित मासाळ यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.


संपर्क : श्री दीपक बेदरकर विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, 9860869462/9860019462
श्री. स्वप्नील बागडे केंद्र प्रमुख, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वणी केंद्र जिल्हा यवतमाळ 9673527124 

आजच्या दिवशी गोंडबुरांडा येथील नागरिकांनी केले होते "आमरण उपोषण"


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज 22 ऑक्टोबर 2023. आणि आजच्या दिवशी म्हणजे मागील 15 ऑक्टोबर 2023 रोज रविवार ला "खोटी ग्रामसभा आणि खोटा ठराव" घेणाऱ्या त्या ग्रामसेवक व पंचायत समिती विरोधात गोंडबुरांडा येथील काही नागरिकांकडून आमरण उपोषण करण्यात आले होते. आठ दिवसाचा कालावधी देण्यात आला होता, तोच आजचा दिवस म्हणजे 'रविवार'. आजचा आठवा दिवस आहे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मारेगाव शाखेच्या माध्यमातून हा लढा उभारण्यात आला होता. परिषदेचे तालुका अध्यक्ष सुमित गेडाम आणि कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके यांनी या आमरण उपोषण कर्त्यांना घेऊन पंचायत समिती ते जिल्हा परिषद असा थेट प्रवास करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर 15 ऑक्टोबर 2023 रोजी पंचायत समिती मारेगाव च्या समोर सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषण सुरु केले होते. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार अशी ताठर भूमिका उपोषण कर्त्यांची होती. तो दिवस म्हणजे आजचा "रविवार". सलग दोन या आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे दिसून आले होते.
उपोषणकर्त्यांचा विषय होता, खोटी ग्रामसभा व खोटा ठराव घेऊन गोंडबुरांडा ग्रामपंचायत च्या सचिवाने येथील गैर आदिवासी आशा सेविकेची निवड केली होती. तो ठराव दिनांक 15/06/2023 असा आहे. या दिवशी खोटी ग्रामसभा दाखवून खोटा ठराव घेण्यात आला असे उपोषणाला बसलेल्या उपोषण कर्त्याकडे म्हणणे असून त्यांच्या कडे सबळ पुरावे आहेत. त्यांना माहिती मिळत नसल्याने त्यांना माहिती अधिकारातून हे सर्व सत्य बाहेर आले.
विशेष म्हणजे ही गोंडबुरांडा ग्रामपंचायत पेसा आहे. त्यातही तिथे प्रशासक लागू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये हा गैर प्रकार करण्यात आला आणि जबाबदार ग्रामसेवक व प्रशासक दोन्ही ही दोषी आहेत. या महाशयांनी कोणालाही कानोकान खबर न लागू देता कागदोपत्री 'डेटा' तयार करून आशा सेविकेची निवड केली, असा उपोषण कर्त्यांसह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदने सुद्धा आरोप केला होता. मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायती पैकी 24 ग्रामपंचायत ह्या 'पेसा' मध्ये आहेत. आणि त्यांना विशेष अधिकार दिले आणि तसा कायदा आहे, हे सर्वश्रुत आहे. मग तरी देखील येथील गोंडबुरांडा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने एवढं धाडस केले कसे हा देखील प्रश्न आपसूकच उपस्थित होतोय. यात काही चिरीमिरी तर झाली नसेल ना! असेही परिषद कडून बोलल्या जात आहे. पेसा कायद्याचे उलंघन करून परस्पर गैर आदिवासीची निवड करणे हा मोठा गुन्हा आहे. आणि तो ह्या महाशयांना अलंगट येणार तर आहेच शिवाय कोणत्याही क्षणी कोणतीही 'वारी' होऊ शकते. जर योग्यरित्या कार्यवाही झाली तर.
विशेष म्हणजे आता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भूमिका काय असणार आहे, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. कारण आठ दिवसात ग्रामसभा व ठराव रद्द करण्यात येईल आणि योग्यरित्या चौकशी करून गोंडबुरांडा ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांच्या वर कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. मारेगाव पंचायत समिती समोर सलग दोन चाललेल्या आमरण उपोषणाचा आजच आठवा दिवस आहे. तो दिवस म्हणजे 'रविवार'. हे विशेष....