वांजरी येथे घरफोडी, चोरट्यांनी चोरून नेला शेतकऱ्याच्या घामाचा पैसा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : गाव शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून बंद घरांना लक्ष करण्याबरोबरच चोरटे मिळेल ते साहित्य लंपास करू लागले आहेत. शेतकरी, शेतमजूर व गोरगरिबांच्या घरांनाही हे चोरटे टार्गेट करू लागले आहेत. बाहेरगावी गेलेल्या एका शेतकऱ्याचे घर फोडून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. सोयाबीनची विक्री करून घरात ठेवलेला घामाचा पैसाही चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. तालुक्यातील वांजरी येथे ही घरफोडी झाली असून सोयाबीनच्या मिळालेल्या रोख रक्कमेसह महिलेचं डोरलं मनीही चोरट्यांनी चोरून नेलं. शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
तालुक्यातील वांजरी येथे वास्तव्यास असलेलं शेतकरी कुटुंबं काही कामानिमित्त बाहेर गावी गेलं होतं. ही संधी सोडून चोरट्यांनी १२ नोव्हेंबरला रात्री दरम्यान घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात सोयाबीनची विक्री करून मिळालेले २० हजार रुपये ठेवलेले होते. तसेच महिलेचं ३ ग्राम वजनाचं मंगळसूत्रही त्याच कपाटात ठेवलेलं होतं. चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घामाचे पैसे व त्याच्या पत्नीचं दागिनं चोरून नेलं. २० हजार रुपये रोकड व १२ हजार रुपये किमतीचं मंगळसूत्र असा एकूण ३२ हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला. याबाबत शेतकरी सुरेश रामचंद्र ढेंगळे (५२) यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.